सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण हे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांच्यावर टिका कराल तर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, ही कोकणाची संस्कृती नव्हे,,असे प्रत्युत्तर भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला आज येथे दिले. भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निषेध केला.
काल रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गाचे निमित्त करून खालच्या पातळीवरील टीका केली होती. वास्तविक पाहता मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न गेली 14 वर्षे प्रलंबित आहे हे स्वतःच रामदास कदम मान्य करतात मात्र तरीही गेले दोन वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर ते औकात, लायकी अशा शब्दात बोलत आहेत. केवळ आपला वैयक्तिक राग आणि द्वेष उगाळण्यासाठी महायुतीचा बळी गेला तरी त्याना त्याची पर्वा दिसत नाही. रवींद्र चव्हाण हे कार्यसम्राट कॅबिनेट मंत्री आणि आमचे दिपस्तंभासम नेते आहेत त्यांच्याविषयी रामदास कदम यांनी अरे तुरे च्या भाषेत बोलणे हे कदापि सहन करण्याच्या पलीकडचे आहे.रामदास कदम यांनी कोणाकडून तरी युती तोडण्याची सुपारी घेतलेली असावी.
शांतपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि क्रांतिकारी निर्णय घेत पूर्ण महाराष्ट्र झपाट्याने बदलून दाखवत असलेले रविंद्रजी चव्हाण आमचे सर्वेसर्वा आहेत, प्रेरणास्थान आहेत. चव्हाणसाहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी अंतिम राहणार आहे. आम्ही रामदास कदम यांच्यासारख्या बेबंद राजकीय प्रवृत्तीचा निषेध करत आहोत, असे भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सावंतवाडी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
यावेळी व्यासपिठावर विशाल परब यांच्यासह ॲड.अनिल निरवडेकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, सावंतवाडी भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, दिलीप भालेकर, साईनाथ जामदार – शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष अमित गवळडकर, नागेश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.