नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. सध्या संपूर्ण जगभरात भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील जवळपास २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे. भारतात १९७१ नंतर पहिल्यांदाच मॉक ड्रिल होणार असून यादरम्यान सायरनही वाजवला जाणार आहे. जर भारत पाकिस्तान युद्ध झाले तर नागरिकांनी या युद्धावेळी स्वत:ला सुरक्षित कसे ठेवावे याचे प्रशिक्षण देण्यासाठी मॉक ड्रिल असणार आहे. त्यातच आता भारत-पाकिस्तान युद्धाची तारीख निश्चित झाल्याचे बोललं जात आहे.
भारतात युद्धाची जोरदार तयारी –
माजी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी नुकतंच एक विधान केले आहे. “सध्या भारत युद्धाची जोरदार तयारी करत आहे. त्यामुळे येत्या १० किंवा ११ मे रोजी भारत पाकिस्तानवर हल्ला करु शकतो”, असे अब्दुल बासित यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. भारत कधीही काश्मीर बॉर्डरवर लष्करी हल्ला करू शकतो. तसेच पाकिस्तानच्या एका मंत्र्याने इस्लामाबादमध्ये केलेल्या वक्तव्यानुसार भारत नियंत्रण रेषेवर कधीही हल्ला करु शकतो. नवी दिल्लीला याचे जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.
शेवटच्या आठवड्यात मॉक ड्रिलचे आयोजन –
1971 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान युद्ध झाले होते. त्यावेळीही मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. या मॉक ड्रिलनंतर 4 दिवसांनी दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. 3 डिसेंबरला युद्धाला सुरुवात झाली होती.
भारतीय लढाऊ विमानांची ताकद –
आता मॉक ड्रिलपूर्वी भारतीय वायुदलाने उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेस वेवर सराव केला. यात त्यांनी भारतीय लढाऊ विमानांची ताकद दाखवली. गेल्या शुक्रवारी वायुसेनेने एक्सप्रेस वेवर दोन टप्प्यांत अभूतपूर्व लष्करी सराव केला. यात दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेत उड्डाण भरणे, लँडिंग, टेक-ऑफ आणि कमी उंचीवरून फ्लाई-पास्ट यांसारख्या तंत्रांचे प्रदर्शन करण्यात आले. रात्री 9 ते 10 च्या दरम्यान झालेली नाईट लँडिंगही पार पडली. याद्वारे भारतीय वायुसेनेमध्ये अत्याधुनिक क्षमता आहे, याची खात्री पटवून देण्यात आली.


