बर्मिंघम : टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल 269 धावांवर बाद झाला. शुभमन गिल जोश टंगच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. शुभमन गिलच्या फलंदाजीच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभी केली. शुभमन गिल बाद झाला तेव्हा भारताच्या 8 बाद 574 धावा झाल्या होत्या. शुभमन गिलनं सुरुवातीला यशस्वी जयस्वाल, त्यानंतर रिषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीप यांच्यासोबत भागीदारी करत संघाला विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. शुभमन गिलनं या खेळीत अनेक विक्रमांची नोंद केली.
बर्मिंघममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीतील दुसरी कसोटी सुरु आहे. शुभमन गिलनं दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. या डावात शुभमन गिलनं अनेक विक्रम मोडले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांच्या विक्रमाचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध एका डावात सर्वाधिक धावा करणारा आशियाई कॅप्टन शुभमन गिल ठरला आहे. भारतासाठी कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडूदेखील तो ठरला आहे.
शुभमन गिलनं सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. सचिन तेंडुलकरनं सिडनीमध्ये 2004 मधील एका मॅचमध्ये नाबाद 241 धावा केल्या होत्या. तर, राहुल द्रविडनं अॅडलेडमध्ये 2003 मध्ये 233 धावा केल्या होत्या. सुनील गावसकर यांनी 1979 ओवलमध्ये 221 धावा केल्या होत्या. शुभमन गिलनं 242 धावा करताच तो यांच्या पुढे गेला.
शुभमन गिलनं कॅप्टन म्हणून देखील सर्वोच्च धावसंख्या करण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वोच्च धावा करण्याचा मान विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 254 धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेविरुद्धचं शुभमन गिलनं 243 धावा केल्या आहेत. याशिवाय विदेश दौऱ्यात 300 धावांचा टप्पा पार करणारा भारताचा कॅप्टन देखील शुभमन गिल ठरला आहे.
भारत मजबूत स्थितीत –
शुभमन गिलचं द्विशतक, यशस्वी जयस्वाल आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं विशाल धावसंख्या उभारली. वॉशिंग्टन सुंदर यानं केलेल्या 42 धावा देखील महत्त्वाच्या ठरल्या. शुभमन गिलनं पहिल्या कसोटीत एक शतक केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावलं आहे. भारताच्या मिडल ऑर्डर आणि लोअर मिडल ऑर्डरनं या मॅचमध्ये कामगिरी सुधारल्याचं पाहायला मिळालं आहे. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधणार का?, ते पाहावं लागणार आहे.


