सावंतवाडी : गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवले तरचं आपल्याला ज्ञानरूपी गुरुचा साक्षात्कार होऊ शकतो, असे महर्षी व्यास गुरुपौर्णिमेनिमित्त राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यासांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाले . तसेच मान्यवरांचे स्वागत ज्युनिअर कॉलेज विद्यार्थ्यांनीच्या स्वागतपर गीतगायनाने झाले.

यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण परिपक्व जीवनाला आकार देण्यासाठी गुरुचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. तेव्हा गुरुच्या सानिध्यात, मार्गदर्शनात विद्यार्थ्यांचा यशस्वी सर्वांगीण विकास होतो. असे सांगून गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी “मी स्वतःला आज सिद्ध करू शकले ते केवळ माझ्या प्रयत्नांमुळे नाही तर माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा दाखवणारे माझ्या जीवनातील सर्व गुरुवर्य यांच्यामुळे झाले. असे सांगत आपल्या सर्व गुरुवर्यांना स्मरण करून अभिवादन करताना विद्यार्थ्यांनी देखील आपल्या जीवनातील गुरुचे महत्व ओळखावे आणि आपले जीवन यशस्वी करावे असे सांगून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमांमध्ये ज्युनिअर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. त्यामध्ये समूह गीतगायन , गुरुचे आणि गुरु-शिष्यांचे नातेसंबंध याविषयी भाषण,एकांकिका, लघु नाटिका इ. इत्यादी विषयांवर विविधअंगी कलेचा आविष्कार विद्यार्थ्यांनी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी कला शाखेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, प्रसिद्धी समिती प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक समिती सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा. जोसेफ डिसिल्वा, प्रा. महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे, प्रा. सविता माळगे, प्रा. डाॅ. अजेय कामत, प्रा. रणजीत राऊळ, प्रा.पवन वणवे, प्रा.दशरथ सांगळे, प्रा. रणजित माने, प्रा. केदार म्हसकर, प्रा. नारायण परब, प्रा. निलेश कळगुंठकर, प्रा.राहुल कदम, प्रा. स्पृहा टोपले, प्रा. माया नाईक, प्रा. प्रज्वला कुबल तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. रश्मी देऊस्कर हिने केले. सूत्रसंचालन कु. तृप्ती देसाई हिने केले तर आभार कु. दुर्वा साधले हिने मानले.


