यवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा शहरात वर्धा – नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्डयात चार मुले बुडाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे. ही मुले तेथे नेमकी कशासाठी गेली होती हे कळलेले नाही. मात्र मुले बुडाल्यानंतर त्यांना स्थानिकांनी पाण्याबाहेर काढून रुग्णालयात नेले. तेथे तपासून त्यांना मृत घोषीत करण्यात आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरात वर्धा-नांदेड स्थानक परिसरातील रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यात पडल्याने चार मुलांना नाका तोंडात ते पाणी गेले. स्थानिकांनी या मुलांना कसे तरी बाहेर काढले. त्यानंतर त्यांना प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने यवतमाळ येथे हलविण्यात आले. या मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या मुलांची नावे रीहान असलम खान ( १३ ) गोलु पांडुरंग नारनवरे (१०) सोम्या सतीश खडसन (१०) वैभव आशीष बोधले (१४) अशी आहेत. ही सर्व मुले दारव्हा शहरात राहणारी असून या मोठ्या दुर्घटनेने परिसरात रेल्वे आणि प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.


