सावंतवाडी : येणार्या काळात सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सावंतवाडीच्या राजघराण्याची १९ वी पिढी निवडणूक रिंगणात उतरत आहे. या पार्श्वभूमीवर युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी राजघराण्याने पुढे केले आहे. सावंतवाडी शहराला ग्लोबल मॅपवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवून मी निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे येथील जनतेने व महायुतीच्या नेत्यांनी मला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन सावंतवाडी संस्थानाच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी केले आहे. राजवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजघराण्याने आपली भूमिका मांडली. यावेळी राजे खेमसावंत भोंसले, राणीसरकार शुभदादेवी भोंसले, संस्थानाचे युवराज लखमराजे भोंसले आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले उपस्थित होते.

यावेळी युवराज लखमराजे म्हणाले, ३५ वर्षांपूर्वी शिवरामराजे भोसले आमदार होते. यानंतर आज नगरपरिषद निवडणुकीत सहभाग घेण्याचा विचार आम्ही केला आहे. महिला आरक्षण पडल्यामुळे आम्ही त्याचा विचार करत आहोत. लोकांची सेवा करण्यासाठी राजघराणे इच्छुक आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या नावासाठी महायुतीशी आमचे बोलणे सुरु आहे. सावंतवाडीच्या जनतेने दिलेले प्रेम बघता पुन्हा या जनतेची सेवा करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. पक्षाकडे आम्ही यासाठी मागणी करणार आहोत. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेणार आहेत.

यावेळी युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, मी सावंतवाडीकर आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. माझा प्रयत्न सावंतवाडीस ग्लोबल स्तरावर आणण्याचा राहणार आहे. राजकारण माझे क्षेत्र नाही. परंतु यात काम करण्याची इच्छा आहे. सावंतवाडीसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे. शहराचा विकास करण्यासाठी माझा उद्देश राहील. इथली परंपरा जपण्यासाठी माझा प्रयत्न राहील. पर्यटन वाढीसाठी माझा प्रयत्न असेल, लोकांच प्रेम अआणि आशीर्वाद माझ्यासह असल्याचे युवराज्ञी म्हणाल्या.

राजेसाहेब खेमसावंत भोंसले म्हणाले, राजकारणात येत सामाजिक कार्य व विकासात्मक काम करण्याचा आमचा हेतू आहे. माझे वडील ५ वेळा आमदार राहीले आहेत. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज, राजेसाहेब शिवरामराजेंचा वारसा पुढे चालवण्यासाठी युवराज लखमराजे राजकारणात सक्रीय आहेत. युवराज्ञी श्रद्धाराजे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. राजघराण्याची १९ वी पिढी राजकारणात येऊ पाहत आहे. दोघेही राजघराण्याचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. ते निश्चितच यशस्वी होतील, असा विश्वास राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी व्यक्त केला.


