वडोदरा : पहिल्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला फलंदाजी आली. भारताने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 314 धावा केल्या. तसेच विजयासाठी 315 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही वेस्ट इंडिजला गाठता आलं नाही. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 103 धावांवर तंबूत परतला. भारताने वेस्ट इंडिजवर 211 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली तरी वेगवान गोलंदाज रेणुका ठाकुर सिंग. रेणुका सिंगने 10 षटकात 29 धावा देत 5 गडी बाद केले. तसेच एक षटक निर्धाव टाकलं. दुसरीकडे, स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे. टी -20 मालिकेत सलग तीन अर्धशतकं झळकावली होती. आता वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही अर्धशतक झळकावलं आहे. स्मृती मंधानाचं शतक अवघ्या 9 धावांनी हुकलं.
सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर रेणुका सिंह ठाकुरही व्यक्त झाली. ‘संघ मला प्रेरित करतो. हरमनने मला गोलंदाजी करायची आहे का?, असे विचारले आणि विकेट पडल्याने माझा आत्मविश्वासही वाढला. काल आम्ही काही स्पॉट बॉलिंग केली कारण ती वनडेसाठी महत्त्वाची आहे. आम्ही सिंगल-विकेट बॉलवर लक्ष केंद्रित केले, मी झुलन गोस्वामीशीही बोललो आणि तिने मला यात मदत केली.’, असं रेणुका सिंह ठाकुरने सांगितलं.


