नागपूर : आज मी असे ऐकले आहे थ्री इडियटची पत्रकार परिषद झाली, त्यात तीन मधील दोन तर ईव्हीएमवर निवडून आले असल्याची घणाघाती टीका भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.
राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे हे ईव्हीएमवर निवडून आले आहे. एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादाने बॅक डोअरमधून निवडून आलेला आहे. तर भांडुपचा देवानंद संजय राजाराम राऊत या तिघांची विश्वासार्हता काय? तिघांमध्ये दोघं ईव्हीएम वर निवडून आले असतील तर मग लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही? लोकसभेवेळी भाजप शेंबड्यांसारखे रडत बसले का? आम्ही कामाला लागलो आणि मेहनत केली, त्यामुळे हरियाणा महाराष्ट्रमध्ये आम्ही सत्ता आणून दाखवली. आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला यांच्याप्रमाणे शेंबड्यासारखे रडत बसलो नाही. असेही मंत्री नितेश राणे म्हणाले. ते नागपूर येथे बोलत होते.
राजीनामे द्यावे आणि नंतर बॅलेटपेपरवर निवडून यावं! – मंत्री नितेश राणे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर भाष्य केलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधी तब्बल 39 लाख मतदार कसे वाढले? असा सवाल त्यांनी यावेळी केलाय. तर पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली असल्याचे ही त्यांनी म्हटलंय. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आणि राहुल गांधी उपस्थित होते. यावरुनच मंत्री नितेश राणे यांनी ही टीका केली आहे. त्यांचे जे निवडून आलेले खासदार आहे त्यांनी राजीनामे द्यावे आणि नंतर बॅलेटपेपरवर निवडून यावं, मग बघावं की त्यांच्यासमोर खासदार लागते की माजी खासदार लागतं, असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
मग आम्ही यांच्यासारखं शेंबड्यांसारखं रडत बसायचं का? -नितेश राणे
यांच दुःख एवढेच आहे की महाराष्ट्रातील सरकार हिंदुत्वाच्या नावाने निवडून आलेले आहे. आमच्या काही काही उमेदवारांना अत्यंत कमी अशी मतं मिळाली आहे. मग तिथे आम्ही अशी ओरड केली का? मालेगाव मध्ये एकाच मतदारसंघात एक एक दीड दीड लाख मतदान झाल्याने त्यांचा खासदार निवडून आला. मग आम्ही यांच्यासारखा शेंबड्यांसारखं रडत बसायचं का? त्यांच्या पत्रकार परिषदेवर जनता हसत होती. स्वतः ईव्हीएमच्या नावावर निवडून यायचं आणि मग रडत बसायचं, लोकांची काम करा ज्याप्रमाणे आमचे मोदी साहेब आणि फडणवीस साहेब काम करतात आहे. असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.


