वाचक मित्रहो,
नुकतेच दहावी व बारावी परीक्षांचे निकाल लागले . एसएससी बोर्ड व CBSE बोर्ड दोन्ही बोर्डाचे निकाल उत्तम लागले आहेत . खरे तर आपणा सर्वांच्या आनंदाची बाब होय . आनंदाच्या वरचा शब्द माहीत नसल्याने मी आनंदापर्यंत थांबलो आहे. आपण शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत इतकी प्रगती केली आहे की, आता यापुढे प्रगतीला काही वावच राहिला नाही असे वाटते . माझ्या संदीप वाकचौरे या अभ्यासू मित्राने या Result चे अत्यंत सविस्तर विश्लेषण केले आहे. त्यानुसार साधारणपणे ७० % विद्यार्थ्यांनी ६०% पेक्षा गुण मिळविलेले आहेत . बहुतेक शाळांचे निकाल हे ९० % च्या वर आहेत . बऱ्याच विद्यार्थ्यांना तर १०० पैकी १०० गुण अगदी सामाजिक शास्त्रे सारख्या विषयात मिळाले आहेत . एकंदरीत आपली शालेय शिक्षण व्यवस्था अत्यंत उत्तम स्थितीत आहे.
आता माझी काही निरीक्षणे मात्र विपरीत आहेत . सोलापूरमधील ज्या शाळेचा दोन्ही बोर्डाचा निकाल १०० % आहे व त्या शाळेतील ९०% पेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी मोठया संख्येने आहेत . या शाळेत गेल्या १० वर्षा पासून एकाही विद्यार्थ्यांने एकही प्रयोग पाहिला देखील नाही. या शाळेत ग्रंथालय नावाची गोष्टच नाही. कोणालाही कोणतेही पुस्तक दिले जात नाही . याचा अर्थ असा होतो की, अशा बाबींचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी काहीही संबंध नाही. ही सोलापूर मधील उच्चभू समाजातील विद्यार्थ्यांसाठी असणारी शाळा म्हणून ओळखली जाते . ही इंग्रजो माध्यमाची CBSE व SSC बोर्ड दोन्ही बोर्डाची मान्यता प्राप्त विना अनुदानित शाळा आहे .असो ! अशा कित्येक शाळा आहेत व तेथे थोडया फार फरकाने अशीच परिस्थिती आहे. संस्था चालकांनी आता CBSE बोर्डाला देखील चांगलेच ताब्यात घेतले आहे असे दिसते .
अनुदानित शाळांमधून देखील यापेक्षा फार वेगळी परिस्थिती असेल असे वाटत नाही ( मी प्रत्यक्षात या शाळा पाहिलेल्या नाहीत ) सन २०१४ पासून काही अल्पसंख्याक समाजाच्या शाळा व काही अपवाद वगळता अनुदानित शाळेत शिक्षक भरती नाही . वेतनेतर अनुदान नाही . कोणत्याही प्रकारचे इन्स्पेक्शन नाही .
असे असूनही जर उत्तम निकाल लागत असतील तर शासनाला शिक्षक भरती करण्याची गरज व घाई कां वाटावी ? इतकी आपली गुणवत्ता उत्तम असताना आपली मुले NAS च्या कसोटीवर कां उतरत नाहीत ?आपण शिक्षण क्षेत्रात काम करणारी मंडळी प्रश्नपत्रिका काढणे , परीक्षा घेणे व पेपर तपासणे या सर्वच स्तरावर . विनाकारण दयाळू व कल्याणकारी होत आहोत कां याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कारण ९०% गुण मिळविलेल्या विद्यार्थ्याला स्वतःच्या गुणांची टक्केवारी काढताना कष्ट पडताहेत . इंग्रजीमध्ये ८५-९० गुण मिळविलेल्या विद्यार्थ्याला २५०-३०० शब्दापर्यंतचा निबंध इंग्रजीत लिहिता येत नाही . मग त्याने मिळविलेले गुण परीक्षकाच्या दयाळूपणाचे तर नव्हेत ना ! असा प्रश्न पडतो . आपण अशी स्वतःचीच किती दिवस फसवणूक करून घेणार आहोत . हा निकाल गुणवत्ता निदर्शक नसून तो गुणवत्तेची सूज दाखविणारा आहे की काय अशी शंका येते .
याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करावा .
– डॉ. ह. ना. जगताप.


