सावंतवाडी : अलीकडे अत्यंत धकाधकीचं बनलेल्या जीवनात व्यस्त असलेल्या परंतु शिक्षण घेण्याची आवड असलेल्या
विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेता यावे, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून एकाच वेळी दोन पदव्या आणि त्याही बाहेरुन घेण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांसमवेत विद्यापीठाने करार केला आहे.
सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयासमवेत हा पहिला करार झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी याबाबातची घोषणा केली. यावेळी संचालक डॉ. शिवाजी सरगर, भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्रा. अनिल बनकर, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, प्रा. मंदार भानुसे, डॉ. लिलाधर बनसोडे, सुभाष वेलिंग यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेले प्रा. श्री. सरगर म्हणाले, आज धकाधकीच्या जीवनात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून आणि त्यापुढे पदवीपासून वंचित राहू नये, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या टीमकडून पुढाकार घेण्यात आला आहे. यात बारावी आणि पदवीनंतर हे शिक्षण घेता येणार आहे. एम. कॉम आणि एम.एस्सी. यांसारख्या तब्बल २८ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यावर्षीपासून हे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. संबधित विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन पदव्यासाठी प्रवेश घेता येवू शकतो. यात एका पदवीसाठी ७५ टक्के हजेरी महत्वाची आहे. दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी हजेरीची अट नाही. संबधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेवू शकतो. विशेष म्हणजे हे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्यामुळे त्याचा फायदा संबधित विद्यार्थ्यांना होणार आहे. नियमित अभ्यासक्रम आणि पदवीच्या तोडीचीच ही पदवी आहे. तसेच एखादा विद्यार्थी राज्यात कोणत्याही केद्रांमधून ही पदवी करु शकतो. कोकणात सात जिल्ह्यात ही केंद्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्याचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कोकणात पहिल्यांदा श्री पंचम खेमराज महाविद्यालया समवेत करार करण्याचा मान देण्यात आला.
दरम्यान विद्यापीठाशी झालेला हा महत्वाचा करार युवराज लखमराजे भोसले यांनी स्वीकारला आहे.


