मुंबई : विरार येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत एका बाजूला कोसळली आहे. या इमारतीमध्ये 15 ते 20 नागरिक इमारतीच्या मलब्याखाली अडकली असल्याची शक्यता आहे. रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली आहे. दहा वर्षापूर्वीची इमारत असून महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती. तरीही नागरिक या इमारतीमध्ये राहत होते. रात्री अचानक ही इमारत कोसळली आणि एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू केले.
विरारच्या नारंगी फाटा येथील रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारतींचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना रेस्क्यू करुन त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. शोधकार्य सुरु आहे. सध्या या इमारतीमध्ये 15 ते 20 नागरिक इमारतीच्या मलब्याखाली अडकली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आज रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली आहे. दहा वर्षापूर्वीची ही इमारत असून महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती. तरीही नागरिकांनी ही इमारतखाली केली नव्हती. पालिकेकडून अनेकदा यासंदर्भातील नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत मध्यभागी आहे आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चाळी असल्याने मदतकार्य पोहोचवण्यास अडथळा निर्माण होतोय. मोठे जेसीबी तिथे पोहोचू शकत नसल्याने मलबा काढणे अवघड झाले आहे.
सध्या ही रमाबाई अपार्टमेंट ही पूर्ण खाली करण्यात आली आहे. मात्र, मोठे जेसीबी पोहोचू शकत नसल्याने मदतकार्य कसे राबवावे आणि मलबा कसा बाहेर काढावा हा मोठा प्रश्न प्रशासना पुढे उभा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून जरी मदतकार्य राबवले जात असले तरीही अजून काही लोक या मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे. काही लोकांना आतापर्यंत वाचवण्यात देखील यश आलंय. ही इमारत पडल्याने परिसरात मोठा आवाज झाला होता.


