मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू आहे. सध्या सरकार त्यांच्या उपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. जरांगे मात्र माघार घ्यायला तयार नाहीत. जरांगे यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. अनेक आमदार, खासदारांनी त्यांची भेट घेऊन एकाप्रकारे जरांगे यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचेच सांगितले आहे. विरोधकांनीही हाच मुद्दा पकडून सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न चालू केलाय.
असे असतानाच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. शिवसेना (ठाकरे गटक) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत दानवे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांचे जरांगे यांच्याशी बोलणं करून दिलं. फोनद्वारे ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाली याबाबत जरांगे यांनी माहिती दिली आहे. इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत आला, हे पाहून उद्धव ठाकरे अचंबित झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच सरकारने तुमच्या मागण्यांवर विचार करायला हवा, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीदेखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे.


