ब्रिस्बेन : भारताचा अंडर 19 संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला दणका दिला आणि 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 225 धावांवर रोखलं. भारताच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियाला फटकेबाजी करण्यात फार काही यश आलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून जॉन जेम्सने सर्वाधिक 77 धावा केल्या तर टॉम होगने 41 आणि स्टीवर होगनने 39 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून काही खेळाडूंनी चांगली फटकेबाजी केली. यात एक नाव आहे वैभव सूर्यवंशीचं.. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यात 38 धावांचं योगदान एकट्या वैभव सूर्यवंशींचं होतं. वैभव सूर्यवंशीने 22 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारत 38 धावा केल्या. त्याने 172.73 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्यानंतर वेदांत त्रिवेदी आणि अभिज्ञान कुंडू यांनी विजयी भागीदारी केली. वेदांतने 69 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. यात त्याने 8 चौकार मारले. तर कुंडूने 74 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने नाबाद 87 धावांची खेळी केली. या तिघांच्या आक्रमक खेळीमुळे भारताने विजयी आव्हान फक्त 30.3 षटकात पूर्ण केलं.
दुसरीकडे, भारताकडून हेनिल पटेलने चांगली गोलंदाजी केली. त्याने 10 षटकात फक्त 38 धावा देत 3 गडी बाद केले. तर किशन कुमारने आणि कनिष्क चौहानने प्रत्येकी 2 विकेट मिळवल्या. यासह आरएस अंबरिशने 1 विकेट घेतली.


