दुबई : भारताने अखेर आशिया कप 2025 जिंकत पाकिस्तानचं तोंड बंद केलं आहे. तिलक वर्माच्या तुफानी खेळीमुळे आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला संघाला लोळवत, टीमने विजेतेपद पटकावले. आधी भारताने पाकिस्तानला 146 धावांत रोखले. भारतीय संघ विजयासाठी 147 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. पण, आतापर्यंत आशिया कपमध्ये शानदार फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा दुसऱ्या षटकात 5 धावा काढून बाद झाला, पण त्यानंतर तिलक वर्माचा शो सर्वांना पाहायला मिळाला. कारण तिलक वर्मा आणि शिवम दुबेने एकहाती फटकेबाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
पाकिस्तानचा डाव 146 धावांवर संपला –
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या पाकिस्तान संघाने चांगली सुरुवात केली होती. त्यांचा पहिला गडी 84 धावांवर गेला, जेव्हा साहिबजादा फरहान 57 (38) धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर मात्र पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. फरहानची खेळी ही पाकिस्तानसाठी सर्वात मोठी ठरली. त्याच्याशिवाय फक्त दोन फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले. फखर जमन 46(35) तर सैम अयूब 14(11) धावा करून बाद झाले. उरलेल्या फलंदाजांत तिघे शून्यावर परतले. कर्णधार सलमान अली आगा 8, हुसैन तलत 1, मोहम्मद नवाज 6 आणि हारिस रऊफ 6 धावा करून बाद झाले. अशा प्रकारे पाकिस्तानचा डाव 146 धावांवर संपला.
कुलदीप यादवची फिरकी जादू –
कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानची कंबर मोडली. 84 धावांवर पहिले यश मिळाल्यानंतर पाकिस्तानचा संपूर्ण डाव 146 वर गुंडाळला. त्याने 4 षटकांत 30 धावा देत 4 गडी बाद केले. कुलदीप यादवसह अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
आशिया कपवर विजयाचा ‘तिलक’!
147 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. दुसऱ्या ओव्हरमध्येच इनफॉर्म बॅट्समन अभिषेक शर्मा आऊट झाला. फहीम अशरफने त्याला आऊट केले. शुभमन गिलने 10 चेंडूत 12 धावा केल्या. तर कप्तान सूर्यकुमार यादव या सामन्यातही फ्लॉप राहिला, 5 चेंडूत फक्त 1 रन करून आऊट झाला. यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र 13व्या ओव्हरमध्ये अबरारने संजू सॅमसन (24) ला आऊट केले.
यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी पुन्हा एक अर्धशतकीय भागीदारी केली. एक टप्प्यावर भारताला जिंकण्यासाठी फक्त 2 ओव्हरमध्ये 17 धावा लागत होत्या. अंतिम ओव्हरमध्ये 10 धावा हव्या होत्या आणि विजयी शॉट रिंकू सिंगने मारत भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतासाठी तिलक वर्माने 53 चेंडूत 69 नाबाद धावा केल्या त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले आणि भारतीय विजयाचा शिलेदार ठरला.


