सातारा : साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारेंसोबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या रचना दिगंबर हगवणे आणि त्यांची बहीण जयश्री दिगंबर हगवणे या दोघीही उपस्थित होत्या.
शिवेसना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या क्लीन चिटवर सवाल उपस्थित केले. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे जाऊन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना क्लीन चिट दिली. मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांना क्लीन चिट दिली हे आम्हाला कळले नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेली क्लीन चिट म्हणजे पोलिसांनी तपास थांबवावा असा एक अलिखित नियम आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

आम्हाला खूप भीती वाटत होती –
या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या रचना हगवणे यांनी आपले अनुभव सांगताना धक्कादायक खुलासा केला. त्या म्हणाल्या, रणजित निंबाळकर यांच्या त्रासामुळेच आम्ही दोघी बहिणींनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. संपदा मुंडेची जी परिस्थिती झाली होती, तशीच परिस्थिती आमची झाली होती. आम्हाला खूप भीती वाटत होती की कोणीतरी आमच्यावर हात टाकेल. आम्ही रणजित निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाता निंबाळकर यांना फोन करून आम्हाला होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली होती, असा आरोप रचना हगवणे यांनी केला.
या प्रकरणातील आपला दाट संशय व्यक्त करताना जयश्री आगवणे म्हणाल्या, “आमचा दाट संशय आहे की संपदा मुंडेची हॉटेलवर नेऊन हत्या करण्यात आली. तिचे नातेवाईक आले नसताना तिची डेड बॉडी का उचलली गेली? त्यांनी सुसाईड नोट गायब झाल्याचाही संशय व्यक्त केला आणि बनकर व बदने ही दोन प्रकरणे वेगळी आहेत की जाणूनबुजून नावे टाकून दिशाभूल केली जात आहे, असा सवाल जयश्री यांनी केला


