सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील 14 गावांच्या वीज समस्या व इतर अडचणी संदर्भात तात्काळ वीज वितरणचे समस्या केंद्र सावंतवाडी तालुक्यात उद्या 24 जूनपासून सुरू करण्यात येईल. त्यानंतर दोन महिन्यात ही सर्व गावे सावंतवाडी तालुक्याला जोडण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेण्यात येईल. मात्र तत्पूर्वी या चौदाही गावांचा गण अहवाल सादर करावा. सर्व पाहणीनंतर निश्चितपणे त्यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी 14 गावांच्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले.
आज सोमवारी या 14 गावांच्या वीज समस्यांचा पाढा अधीक्षक अभियंता श्री. राख यांच्यासमोर उबाठाच्या शिष्टमंडळाने वाचला. वेंगुर्ले तालुक्यात ही 14 गावे समाविष्ट आहेत. त्यामध्ये सातार्डा, तळवणे, साटेली, आरोंदा, मळेवाड, गुळदुवे, तिरोडा, नेमळे, आजगाव, भोमवाडी, नाणोस, धाकोरे आदि गावांचा समावेश आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली या चौदा गावांचे शिष्टमंडळ आज कुडाळ अधीक्षक अभियंता श्री. राख यांच्या कार्यालयात धडकले. यावेळी श्री राऊळ यांनी ही चौदा गावे सावंतवाडी तालुक्याला तात्काळ जोडा, अन्यथा आम्हाला दोन महिन्यात व्यापक आंदोलन छेडावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिला.

यावेळी नवीन वीज मीटर बसवण्याची सक्ती करू नये, तसेच तिन्ही तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आपण लक्ष द्यावे, असेही रूपेश राऊळ यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, आबा केरकर, उदय पारिपत्ये यांनी विविध समस्या व अडचणी स्पष्ट केल्या.
दरम्यान, वीज वितरणच अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी 33 केव्ही लाईनमध्ये झाडे-झुडपे नियमित संपर्कात येतात. त्यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. एप्रिल, मे महिन्यात खरं तर वीज कर्मचाऱ्यांनी विज लाईनवरील झाडे तोडणे आवश्यक होते. मात्र हे केले गेले नाही, यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्यामुळे अडचण निर्माण झाली. मात्र आता निश्चितपणे ती सुधारणा केली जाईल. कुडाळ तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आहेत. आता जिल्ह्यातील इतर तालुक्यातही सर्व ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सबस्टेशन फिडरमध्ये ज्या अडचणी उद्भवत आहेत, त्या दूर केल्या जातील. ग्राहकांना कोणत्याही समस्याला तोंड द्यावे लागणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. ही 14 गावे सावंतवाडी तालुक्यातील आहेत. तसा अहवाल सादर करा. तसेच गणमध्ये कुठल्या भागात ही गावे आहेत, याचाही समावेश करून तसा परिपूर्ण अहवाल सादर करा. निश्चितपणे आपण वरिष्ठ कार्यालयाला हा अहवाल सादर करू, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शब्बीर मणियार, मनोहर आरोंदेकर, बाळू माळकर, गोविंद केरकर, विद्याधर नाईक, निवृत्ती नाईक, संतोष पेडणेकर, सौ. सुभद्रा नाईक, शिल्पा नाईक, स्मिताली नाईक, सिद्धू नाईक, सचिन मुळीक, सिद्धान्त पांगम, दिलीप बहिरे, सखाराम राऊळ, सिद्धेश नेमळेकर, वासुदेव राऊळ, हरेश पेडणेकर, दत्तराज कोरगावकर, शुभम सातार्डेकर, दीपक सातार्डेकर, प्रशांत सातार्डेकर, गौरेश तुळसकर आदि उपस्थित होते.


