सावंतवाडी : काल राजकोट मालवण येथे जो राडा झाला तो काही वर्षांपूर्वी वेंगुर्ल्यात झालेल्या राड्याची आठवण ताजी करणारा होता.राज्यभरात सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राडा संस्कृतीशी जोडण्याचा हा लांच्छनास्पद प्रकार होता. हा खरं तर जिल्ह्याचा अपमान आहे.
“घराघरात फिरून रात्री एकेकाला मारून टाकीन”
“पुतळा पडला म्हणून तुमच्या भावना दुखावल्या काय?” अशी वक्तव्यं नवनिर्वाचित खासदार, माजी मुख्यमंत्री महाशयांची जर असतील तर कुठल्या संस्कृतीचे दर्शन आपण महाराष्ट्राला देत आहोत ह्याचे भान राहिलेलं दिसत नाहीये.
“पुतळा पडला हे शुभसंकेतच आहेत, ह्यातून पुढे चांगलंच घडेल.आता शंभर फूटी पुतळा उभारू ” अशी संतापजनक वल्गना शिक्षणमंत्री करत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तर गायबच झालेले आहेत. पुतळ्याची काळजी घेण्याची जबाबदारी खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाची होती.पण पुतळा नौदलाने बांधला असं जनतेची दिशाभूल करणारे विधान करून ते नामानिराळे होऊ पाहात आहेत. सगळाच प्रकार खरोखरच महाराष्ट्रात आणि त्यात देखील माझ्या सिंधुदुर्गात घडत आहे. यावर अजूनही विश्वास ठेवणं कठीण आहे, अशी प्रतिक्रिया उबाठा सेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिली आहे.


