सावंतवाडी : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या मागण्यांना कोणाचाही विरोध नाही. त्यांच्यासोबत चर्चा सुरु आहेत, त्यामुळे त्यांनी न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच गणेशोत्सवासारखा मोठा सण सुरु आहे. त्यामुळे त्यांनी सहकार्य करावे अन् ते निश्चितच ते करतील, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईंबद्दल मनोज जरांगे यांनी केलेल्या विधानाबद्दल ते म्हणाले, ‘याबद्दल जरांगे यांनी माफी मागितली आहे व देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. त्यामुळे हा विषय आता इथेच संपला पाहिजे. याव्यतिरिक्त, पावसाळ्याला उशीर झाल्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश शासनाने दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी उत्सुक असतो. कोकणी माणूस या सणासाठी असेल तिथून गावाकडे येतो. ही परंपरा अशीच अबाधित राहावी, कोकणच्या जनतेला सुख-समृद्धी मिळावं अशी प्रार्थना श्री. केसरकर यांनी गणपतीकडे केली.


