- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा जिल्हा परिषदनिहाय आढावा
सावंतवाडी : केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मी अलीकडेच भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील प्रवासी संघटनेकडून दिलेले निवेदन माझ्याकडे होते. सावंतवाडी टर्मिनसचा विषयही त्यात प्रामुख्याने होता. तसेच जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर रेल्वेचे थांबे वाढविण्यासाठी मी मागणी केली आहे. रेल्वेमंत्री अनुभवी असून मार्ग काढणारे आहेत. खासदार म्हणून नारायण राणे तिथे आहेत. पालकमंत्री म्हणून मी पाठपुरावा करत आहे. राज्यात महायुतीच सरकार आहे त्यामुळे निश्चितच हे सर्व प्रश्न सुटतील, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिक्षण क्षेत्रात विविध पद्धतीचे प्रयोग ‘एआय’च्या माध्यमातून होत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आज अमेरिकेतील शिक्षक जिल्ह्यातील मुलांना शिक्षण देऊ शकतो अशी यंत्रणा उपलब्ध आहे. विद्यार्थांना जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचे विविध मार्ग एआयच्या माध्यमातून उपलब्ध असून जिल्हा, राज्य पातळीवर आम्ही याचा अभ्यास करत आहोत. शिक्षण क्षेत्रात विक्रांत सावंत यांच्यासारखे सहकारी मोठ्या पदावर येत असल्याने सिंधुदुर्गाच्या शैक्षणिक क्षेत्रात भविष्यात निश्चितच मोठ्या प्रमाणात क्रांती होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या शुभेच्छा भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. जिल्ह्यात भाजपचेच कार्यकर्ते सर्वाधिक आहेत. खासदार भाजपचे असून मी स्वतः पालकमंत्री आहे. जिल्ह्यातून खासदार नारायण राणे यांना लोकसभेत ९५ टक्के मतदान होते. या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. प्रत्येक पक्षाला स्वतःची ताकद वाढवण्याचा व आत्मपरीक्षणाचा करण्याचा अधिकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठका होत असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आज आढावा बैठक पार पडली. यावेळी लोकसभा, विधानसभा निवडणुकांतील परिस्थितीचा जिल्हा परिषदनिहाय अभ्यास आम्ही केला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे उद्दीष्ट आमचं होत. प्रदेशसह वरिष्ठांना जिल्ह्यातील परिस्थिती कळवू, पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय देतील त्यानुसार निवडणूक लढवू अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पाऊस अधिक प्रमाणात असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यासंदर्भात मार्ग काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व आम्ही करत आहोत. पावसानं थोडी साथ दिली तर निश्चितच परिस्थिती बदलेल. खड्डे भरले जात नाही अशी स्थिती नाही. मात्र, पावसामुळे ते पुन्हा पडत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ही परिस्थिती लवकरच बदलेल. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते अधिक चांगले असणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


