सावंतवाडी : संत शिरोमणी रोहिदास यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपत जातिभेद व धर्मभेद मिटवण्यासाठी सनातनी समाजाविरोधात बंड केले सतीच्या चालीचे अवडंबर माजू दिले नाही. अशा या संत रोहिदास यांनी जागतिक संत संमेलन घेतले. त्यावेळी ब्राह्मणांनी श्रीक्षेत्र काशीमध्ये पालखीतून त्यांची मिरवणूक काढली होती. अशा संत शिरोमणी रोहिदाससारख्या संतांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. अशा या थोर संतांची शिकवण समाजाने अंगीकारून अनिष्ट रूढी परंपरांना तिलांजली द्यावी, असे आवाहन संत शिरोमणी रोहिदास यांचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ निवृत्त शिक्षक परशुराम बी. चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले. संत रोहिदास यांच्या 648 व्या जयंती उत्सवानिमित्त सावंतवाडी येथे बोलत होते.
सावंतवाडी येथील समाज मंदिरमध्ये संत रोहिदास यांच्या जयंती उत्सव झाला. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा सावंतवाडी तालुका समाज मंडळाच्या वतीने आयोजित या जयंती उत्सवानिमित्त सुरुवातीला समाज मंडळाचे तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीप प्रज्वलन झाले यावेळी प्रास्ताविकात मंडळाचे सचिव गुंडू चव्हाण यांनी संत रविदास यांच्या जीवनावर माहिती दिली यावेळी समाज मंडळाचे अध्यक्ष गणेश म्हापणकर , सचिव गुंडू चव्हाण, जिल्हा कार्यकारी सह सेक्रेटरी बाबुराव चव्हाण, मार्गदर्शक विजय चव्हाण, लक्ष्मण आरोसकर, नरेश कारिवडेकर, दिलीप इन्सुलकर, डॉ. शरद जाधव, शेखर दाभोलकर, विजय ओटवणेकर, राजकुमार चव्हाण, राजेश फोंडेकर, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे श्री. चव्हाण म्हणाले, घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या “अनटचेबल” ग्रंथामध्ये संत रोहिदास यांचा खास उल्लेख करण्यात आलेला आहे संत रोहिदास यांनी जागतिक संत संमेलन घेण्याचा मान मिळवला आहे तर सिकंदर लोधी या महाराजाचा राजगुरू असलेल्या संत रोहिदास यांना त्यांनी दिल्ली तुकलताबाद येथील बारा एकर जमीन गुरुदक्षिणा म्हणून बहाल केली होती तर मक्का या मुस्लिम धर्मियांच्या पवित्र स्थानाच्या ठिकाणी सिकंदर लोधी यांनी संत रोहिदास यांना नेले त्यांच्यासोबत संत कबीरही होते, असेही चव्हाण म्हणाले. आभार प्रदर्शन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी केले.
संत शिरोमणी रोहिदास यांच्या जयंतीसाठी समाज मंदिर येथे सभागृहात आसन व्यवस्था नसल्याबद्दल नाराजी!
दरम्यान, सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील समाज मंदिर येथे संत रविदास जयंती उत्सवासाठी सभागृहात खुर्च्या नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.सावंतवाडी येथील समाज मंदिर हॉलमध्ये आज बुधवारी संत शिरोमणी रोहिदास यांची जयंती साजरी करायची असल्याची कल्पना सावंतवाडी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती सकाळी साडेआठ वाजता ही जयंती साजरी केली जाणार होती. मात्र याबाबतची कोणतीही व्यवस्था नगरपरिषदेकडून करण्यात आलेली नाही तर या हॉलसाठी देण्यात आलेल्या खुर्च्याही अन्यथा हलवण्यात आल्यामुळे उत्सवासाठी आलेल्या बांधवांना ताटकळत उभे राहावे लागले. अखेरीस याबाबत खडसावल्यानंतर कर्मचाऱ्यांनी खुर्च्यांची व्यवस्था केली. या प्रकाराबद्दल चर्मकार उन्नती मंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारी सहसेक्रेटरी बाबुराव चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर याबाबतचे नाराजीचे पत्र समाज मंडळाच्या वतीने सावंतवाडी नगरपरिषदेला देण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर यांनी सांगितले.


