मालवण : मानवता विकास परिषदच्या वतीने, १४ मे रोजी मालवण मधील लिलांजली सभागृह येथे ‘छत्रपती संभाजी महाराज जयंती’ साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करुन व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी मानवता विकास परिषदच्या वतीने मंचावर उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवर ॲड. समीर गवाणकर, माजी नायब तहसीलदार आनंद मालवणकर व मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या शौर्याबद्दल मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कु. सार्थक वणकुद्रे याने शिवगर्जना सादर केली.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. समीर गवाणकर, मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत, माजी नायब तहसीलदार आनंद मालवणकर, बिळवस ग्रामपंचायत माजी मानसी पालव, दादा वेंगुर्लेकर, उद्योजक संतोष नागवेकर, सौ. वणकुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरीत्राचे कथन केले. छत्रपती संभाजी महाराज यांची कार्यप्रणाली गावपातळीपासूनच अंमलात आणली तर राष्ट्र सक्षम होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेतून हिंदू धर्मरक्षक राष्ट्रपुरुष संत श्री. पाचलेगांवकर महाराज यांच्या मार्गदर्शनपर शिकवणीची माहिती कथन केली.
यावेळी बोलताना मान्यवर ॲड. समीर गवाणकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्म रक्षणार्थ केलेल्या कार्याचा व छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरीत्राचा आढावा घेतला. अत्यंत अल्पवयात त्यांनी हिंदू धर्मरक्षणासाठी औरंगजेबाच्या धार्मिक जुलूमशाही विरुद्ध दंड थोपटले आणि तत्कालीन प्रबळ औरंगजेबाला ते शरण न जाता कसे लढले हे आजही जास्त महत्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले.
यावेळी मान्यवर आनंद मालवणकर यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे पराक्रम कणखरता शिकवतात आणि त्यांचे बुधभूषण ग्रंथ व अलौकीक साहित्य म्हणजे अनमोल ठेवा आहे.
या कार्यक्रमाला शिवप्रेमी, नागरीक यांची उपस्थिती होती. मानवता विकास परिषदेच्या वतीने उपस्थितांचे आणि कार्यक्रमासाठी सहकार्य केलेले माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, व्यावसायिक संजय गावडे, लीलांजली सभागृह व्यवस्थापन व सहकारी यांचे आभार मानण्यात आले.


