सिंधुदुर्ग : अलीकडे राज्यात महिला आणि बालिकांवरील अत्याचाराच्या घटना खूप वाढल्या आहेत. याबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा मनसे पदाधिकारींनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मनसेने महिला सुरक्षिततेबाबत काही सूचना आणि तक्रारी या निवेदनातून मांडल्या आहेत.
निवेदनात ‘मनसे’ मागण्या पुढीलप्रमाणे –
१) महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री समिती गठीत करून महिन्यातून किमान १ वेळा बैठक आयोजित करणे अनिवार्य आहे. परंतू याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
२) प्रत्येक शाळेमध्ये सी.सी.टीव्ही. कॅमेरे, तक्रार पेटी बसविल्या आहेत की नाही याची खातरजमा करावी.
३) रहदारीच्या ठिकाणी शासनामार्फत सी. सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. व सी.सी.टीव्ही कॅमेरे पूर्णपणे कार्यान्वित आहेत याची माहिती सतत घ्यावी.
४) सिंधुदुर्ग हद्दीतील सर्व शाळा व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांमध्ये काम करत असलेल्या कामगारांची पोलीस पडताळणी झालेली आहे की नाही याची खातरजमा करून न घेतलेली असल्यास कठोर कारवाई करण्यात यावी.
५) सिंधुदुर्ग हद्दीतील महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत की नाही ते तपासून नसल्यास कारवाई करणे.
६) सिंधुदुर्ग हद्दीतील रात्रीच्या वेळेस निर्भया पथकाची गरत वाढवून महिलांमध्ये जनजागृती निर्माण करणे,
वरील नमूद मुद्दयाची अंमलबजावणी होत आहे याची खातरजमा करण्यासाठी पोलीस तसेच स्थानीक प्रशासनाची समिती नेमण्याची मागणी केली आहे. जेणेकरून महिला अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालता येईल.
असे मनसेने निवेदनातून म्हटले आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सौ. मोनिका फर्नाडिस, जिल्हाध्यक्ष धीरज परब, अॅड. अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, मिलिंद सावंत, चिन्मय नाडकर्णी, सागर जाधव, राजू कासकर, यतिन माजगावकर, विजय बांदेकर, सतीश आकेरकर आदि उपस्थित होते.


