सावंतवाडी : कोकणातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा हा एक कळीचा मुद्दा ठरत असून त्यासाठी आम्ही माध्यमिक स्तरापासूनच स्पर्धा परीक्षा व त्याविषयी जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी पुढील काळात योग्य रणनीती आखून सुव्यवस्थित नियोजन करू, असे उद्गार शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे संचालक तसेच राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत यांनी काढले.
जिजाऊ संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे संस्थापक निलेश सांबरे आणि राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन’ कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना श्री. सावंत बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समन्वयक तसेच अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांच्या प्रस्ताविकाने झाली.
यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले वक्ते वाल्मिक बिलसोरे यांनी महाराष्ट्र राज्यात इयत्ता दहावी व बारावीचा सर्वात गुणवत्तापूर्ण निकाल हा कोकण बोर्डाचा असतो. तरीही स्पर्धा परीक्षांच्या गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची नावे दिसत नाहीत. याची कारणमीमांसा करत व स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे शिस्तबद्ध नियोजन कसे करावे?, या अनुषंगाने प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
दुसरे मार्गदर्शक वक्ते मार्गदर्शन करताना कुडाळ MIDC असोसिएशनचे अध्यक्ष तथा यशस्वी उद्योजक मोहन होडावडेकर यांनी सांगितले की, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा हेतू आणि संकल्प यासाठी केला गेला की, विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या अडचणी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हा विचार करून त्यातला थोडासा मदतीचा खारीचा वाटा म्हणून आम्ही ‘जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या दातृत्वाने कार्य करत आहोत. विद्यार्थ्यांनी या कार्याचा सकारात्मक विचार करून वह्यांच्या प्रत्येक कोऱ्या पानांवरती आपले सुंदर आणि यशस्वी असं भवितव्य घडविण्यासाठी अभ्यासपूर्ण लेखन करावे, असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थीला तीन वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे संचालक प्रा. सतीश बागवे, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पार्सेकर, मार्गदर्शक वाल्मिक बिलसरे, उद्योजक मोहन होडावडेकर, तसेच इतर मान्यवर प्रशांत सावंत, श्रीमती अर्पिता वाटवे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीमती संप्रवी कशाळीकर ,उपमुख्याध्यापक संजय पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा.जोसेफ डिसिल्वा, महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे, प्रा. सविता माळगे, प्रा. डाॅ. अजेय कामत, प्रा. रणजीत राऊळ, प्रा.पवन वनवे , प्रा.दशरथ सांगळे, प्रा. माया नाईक, प्रा. सृहा टोपले, प्रा. निलेश कळगुंटकर , प्रा. राहुल कदम यांसह सर्व प्राध्यापक, सर्व शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जोसेफ डिसिल्वा यांनी केले तर आभार प्रा. संतोष पाथरवट यांनी मानले.


