- चिंतन –
परवा एका ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो एका सहलीची चौकशी करयची होती . वास्तविक वर्तमानपत्रातील जाहिरातीमधून बरीच माहितीही झाली होती त्यामुळे केवळ काही जुजबी चौकशी करून पैसे भरायलाच गेलो होतो . त्या ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाशी बोलताना त्यानेही आमची थोडीशी माहिती घेतली . आणि त्याने सांगितले की, सर तुम्ही आमच्या Trip बरोबर येवू नका आमच्या सोयी सुविधा तुम्हाला मानवणार नाहीत . वास्तविक त्यांच्या अटी शर्ती वाचूनच आम्ही गेलो होतो . त्याने प्रामाणिकपणे आपल्या त्रुटी सांगितल्या वास्तविक त्यामुळे त्याचे नुकसानच होत होते तरीही त्याने हा प्रामाणिकपणा दाखविला. खरे तर अशा बाबी दुर्मिळच ! आपले नुकसान होत असताना देखील प्रामाणिकपणे वागणाऱ्या लोकांच्या प्रामाणिकपणाचे काय करायचे ?
असाच एक प्रसंग १९९०-९५ दरम्यान मी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर असताना घडला . विद्यापीठातील एका प्राध्यापकाने एम .एड च्या तीन विदयार्थांना एका पेपर मधे ५२ व ५३ गुणाऐवजी ते खोडून ५५ गुण दिले होते .
हे प्रकरण आमच्याकडे चौकशीसाठी आले होते सदरचे प्राध्यापक खूप प्रामाणिक होते हे आम्हा चौकशी समितीच्या सदस्यांना देखील माहीत होते परंतु कोणीतरी याबद्दल तक्रार केली होती . त्यांना असे कां केले असे विचारले असता त्यांनी सांगितले की, एम एडला बी+ असल्याशिवाय नोकरी मिळत नाही म्हणून मी ते गुण वाढवले .वास्तविक त्याऐवजी ते असे म्हणू शकले असते की, मला नंतर विचार केल्यावर अधिकचे गुण देणे योग्य वाटले . ते जर असे म्हटले असते तर परीक्षकाच्या अधिकारा संबधी चौकशी समिती आक्षेप घेवू शकत नव्हती परंतु मी दयेपोटी गुण वाढविले असे म्हणणे कायदेशीर ठरत नव्हते . आम्ही पुन्हा पुन्हा विचारले तरी त्यांनी आपले उत्तर कायम ठेवले व त्यांच्या या प्रामाणिकपणाची त्यांना शिक्षाही झाली .
अशी प्रामाणिक माणसे पाहिल्यावर खरोखरच आश्चर्य वाटते . त्यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक करावे की अव्यवहार्यते बद्दल कीव करावी हे समजत नाही . अशावेळी का कोणास ठाऊक अशा माणसांबद्दल दया वाटते . माणसाने इतके प्रामाणिक असावे कां? असा प्रश्न पडतो.
– डॉ. ह. ना.जगताप.


