सावंतवाडी : गोव्यात आपल्या बहिणीकडून भाऊबीजेची ओवाळणी घेऊन परतणाऱ्या विलवडे-फौजदारवाडी येथील एका २० वर्षीय तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ऋषिकेश बापूजी दळवी असे या तरुणाचे नाव असून, बांदा-हसापूर मार्गावरील चांदेल (गोवा) या परिसरात हा भीषण अपघात झाला. ऋषिकेशच्या अकाली निधनामुळे विलवडे गावावर आणि विशेषतः दळवी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. तो रविवारी भाऊबीज साजरी करण्यासाठी गोव्यात आपल्या बहिणीकडे गेला होता. सायंकाळच्या सुमारास तो आपल्या दुचाकीने विलवडे येथे परत येत असताना, मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याची दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या एका झाडावर जोरदार आदळली. हा अपघात इतका गंभीर होता की, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ऋषिकेशचा जागीच मृत्यू झाला.
भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून दळवी कुटुंबियांचे सांत्वन –
या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांनी विलवडे येथील दळवी कुटुंबियांच्या निवासस्थानी धाव घेतली. परब यांनी शोकाकुल दळवी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि या दुःखाच्या प्रसंगी पक्ष व संघटना त्यांच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाही दिली. एका तरुण आणि होतकरू मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबाचे झालेले मोठे नुकसान शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचे आहे. परब यांच्या या भेटीमुळे दळलेल्या कुटुंबियांना थोडासा भावनिक आधार मिळाला.
ऋषिकेशच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या मित्रांनी आणि शिक्षकांनीही तीव्र दुःख व्यक्त केले असून, दळवी कुटुंबाला या असीम दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो, अशी प्रार्थना सर्व स्तरातून केली जात आहे. यावेळी त्यांच्या सोबत विलवडे येथील विनेश गवस, कास सरपंच प्रवीण पंडित, नितीन राऊळ, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.


