सावंतवाडी: वाढदिवसाचा जल्लोष केवळ फटाके, बॅनर आणि हारतुरे यापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श आंबोली गावात पाहायला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली ग्रामपंचायत येथे एकल महिला भगिनींना साखर वाटप करून त्यांच्या वाढदिवसाचा अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला.

आंबोलीच्या मा. सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री वामन पालेकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. साखर वाटपाच्या माध्यमातून समाजातील गरजू आणि एकल महिला भगिनींप्रती आपुलकी व्यक्त करत सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
यावेळी उपस्थित माता-भगिनींनी पालकमंत्री नितेश राणे साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि भविष्यातील राजकीय व सामाजिक वाटचालीत भरघोस यशासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
कार्यक्रमास आंबोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री वामन पालेकर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य काशीराम राऊत, गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटांच्या पदाधिकारी व सदस्य तसेच अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



