सावंतवाडी : गेल्या अनेक दिवसांपासून वेत्ये परिसरातील BSNLची दूरध्वनी व इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईल नेटवर्क गायब, इंटरनेट ठप्प आणि ग्राहकांचे हाल अशा परिस्थितीत अखेर वेत्ये ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाजी गावडे यांनी थेट BSNL कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
“ग्रामीण भागातील नागरिकांनी नियमित बिल भरूनही दर्जेदार सेवा का मिळत नाही? विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, शेतकऱ्यांची कामे, व्यापारी व्यवहार आणि सर्वसामान्य नागरिकांचा दैनंदिन संपर्क विस्कळीत होण्यास जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल सरपंच गावडे यांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला.
यावेळी BSNLच्या अधिकाऱ्यांनी सेवा खंडित होण्यामागील तांत्रिक अडचणींची माहिती देत, पुढील दोन दिवसांच्या आत वेत्ये परिसरातील दूरध्वनी व इंटरनेट सेवा पूर्णपणे सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
सरपंच गुणाजी गावडे यांनी नागरिकांच्या संयमाचा अंत पाहता, आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन उभारण्याचा इशाराही दिला.
यावेळी सरपंच गुणाजी गावडे यांच्यासमवेत पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, ग्रामपंचायत सदस्य राजन आंबेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील BSNL सेवेचा वारंवार होणारा बोजवारा आणि त्यातून नागरिकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता, आता दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते, याकडे वेत्ये ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.



