सावंतवाडी : अलीकडे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना सरकारी नोकरी आणि मोठ्या पगाराची अपेक्षा ठेवून वावरताना दिसत आहेत. मुलं देखील आपल्या इच्छा – आकांक्षा या चांगल्या मोठ्या पगाराच्या बाळगून आहेत. मात्र असे असले तरी अलीकडचे सामाजिक चित्र विदारक आहे. वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून तुम्ही काहीही बना पण सर्वात प्रथम उत्तम माणूस बना, राष्ट्राचं कल्याण होईल, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी आरोस येथे व्यक्त केले. आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ आरोस संचलित, विद्या विकास हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रा. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक नॅशनल युनियन ऑफ सी फूडचे अध्यक्ष तथा मराठा समाज सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. प्रेमानंद साळगावकर, महेंद्र अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर तसेच जिल्हा तांत्रिक तज्ज्ञ नगर विकास विभागाचे निखिल आनंद नाईक, संस्थेचे अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, सचिव राजन नाईक, मुख्याध्यापक शिरीष नाईक, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष प्रसाद मडूरकर, पत्रकार विश्वनाथ नाईक, साबाजी परब, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रमुख सौ. श्रद्धा मुळीक, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री कु. देवराव मुळीक, मुख्यमंत्री कु. साईश जाधव यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले की, कोकणातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमत्ता आणि विलक्षण चातुर्य असलेले आहेत. मात्र स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाअभावी येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत हवे ते यश मिळवता आले नाही. त्यासाठी आगामी काळात स्पर्धा परीक्षाची कास धरावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी निखिल नाईक यांचा स्नेह सत्कार करण्यात आला. श्री. नाईक म्हणाले, मला या शाळेचा अभिमान आहे, ग्रामीण भागात असलेली ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटताना मी नेहमीच साक्षीदार राहिलो आहे. यावेळी महेंद्र पेडणेकर म्हणाले यश आणि अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र असे असले तरी आपण अपयश मिळाले तरी खचून न जाता जिद्दीने प्रयत्न केला तर एक दिवस यश नक्की मिळते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. प्रेमानंद साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करिअर करा. मराठी सोबतच इंग्रजी भाषा बोलता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ मराठी आपली मातृभाषा आहे म्हणून त्यावर प्रभुत्व ठेवाच, परंतु इंग्रजी सारखी भाषा आलीच पाहिजे. तसेच गुरुजन आई-वडील आणि थोरांचा आदर करा. दैनंदिन वर्तमानपत्रे वाचा. सातत्याने नाविन्याची कास धरा. स्वतःला शालेय जीवनात शिस्त लावा, असा सल्लाही श्री. साळगावकर यांनी दिला.
संस्थेचे अध्यक्ष रोहिदास सावंत म्हणाले, शाळेच्या प्रगतीचा सार्थ अभिमान वाटतो. शाळेच्या विकासासाठी काहीही लागले तरी मला फक्त हाक मारा. नेहमीच मदतीला तयार आहे. मुलांनी अभ्यास करून खूप मोठे व्हा आणि आपल्या शाळेचे आणि गावांचे नाव उज्वल करा, असेही श्री. सावंत यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी केले. सूत्रसंचालन तानाजी वरक यांनी तर उपस्थितांचे आभार अनिल नाईक यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक शिक्षक अनिल नाईक, तानाजी वरक, सौ. चव्हाण, सौ. मुळीक, सौ. नेमळेकर, श्रीमती नाईक व लिपिक श्री. खोत यांनी केले. या कार्यक्रमात शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष प्रसाद मडूरकर यांना ‘आदर्श पालक पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.