नागपूर : नाशिक व रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुती सरकारमध्ये वाद असतानाच विदर्भातील गोंदिया, भंडारा, बुलढाणा, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री बदला, असा सूर महायुतीतील घटक पक्षांमध्ये आळवला जात आहे. या जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, केवळ ध्वजारोहणासाठीच ही तात्पुरती व्यवस्था केली काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे आमदार व राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बाबासाहेब पाटील यांनीही या नियुक्तीवरून नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे आमदार व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासाठीही भंडारा जिल्हा नवाच आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील वाईचे आमदार आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील यांनाही बुलढाण्यात पाठविले.
मंत्र्यांसोबत महायुतीतील भाजप, शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांचा या मंत्र्यांशी कधी संपर्कही नाही आणि ओळखही नाही. त्यामुळे किमान त्या जिल्ह्यातील नाही तर, आसपासच्या जिल्ह्यातील परिचित मंत्र्यांकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली असती तर बरे झाले असते, अशा भावना महायुतीतील पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या आहेत.
आमदार एका पक्षाचे ; पालकमंत्री दुसऱ्याच पक्षाचे –
गोंदिया, वाशिम आणि बुलढाणा या तीन जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. भंडाऱ्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे गेले आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या तिन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाहीत. तर, भंडाऱ्यातही भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची देखील चांगलीच पंचाईत होत असून, आपल्या भावना पक्षाकड़े व्यक्त करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.