सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे येथे बेकायदेशीररीत्या बैलांची झुंज लावून प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
तळवडे गोठावडेवाडी येथे बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.तळवडे येथील गोठावडेवाडी परिसरात काही व्यक्ती बैल जातीच्या पाळीव प्राण्यांची झुंज लावून त्यांना दुखापत होईल अशा प्रकारे क्रूरतेने वागवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही कारवाई केली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार मंगेश शिंगाडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी या घटनेप्रकरणी उमेश अर्जुन सावंत (४५, रा. पेंडूर-मातोंड, ता. वेंगुर्ला), ओमकार भरत रेडकर (२६, रा. तळवडे, ता. सावंतवाडी), मोहन लव जोशी (६०, रा. नेरूळ-ठाकूरवाडी, ता. कुडाळ) आणि शरद अनंत आसोलकर (५५, रा. बाव – गाळववाडी ता. कुडाळ) या चार संशयित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५ सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९६० चे कलम ११(१) (अ) व ११ (१) (न) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सर्व संशयितांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन –
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, पाळीव प्राण्यांची झुंज लावणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणीही प्राण्यांना क्रूरतेने वागवू नये, असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. अशा घटना कुठेही घडत असल्यास सुजाण नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.


