बांदा : “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते. विविध रक्तपेढ्यांमध्ये निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. रक्तदान हेच सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असून अशा उपक्रमांमुळे समाजात मानवतेची भावना अधिक दृढ होते. रक्ताच्या प्रत्येक थेंबात मानवतेचा स्पंदनशील संदेश असतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
आनंदी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात तब्बल ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांच्या जीवनाला आशेचा नवा किरण दिला.हे रक्तदान शिबिर श्री स्वराज्य प्रतिष्ठान, बांदा, सार्वजनिक नवरात्रोत्सव व कला-क्रीडा मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा, ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा बांदा यांचेही या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, बांदा पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, कार्याध्यक्ष महेश रेमूळकर, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, सार्वजनिक नवरात्र कट्टा कॉर्नर मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक, गुरुनाथ नार्वेकर, बाबली गवंडे, लोकमान्य बँकेचे व्यवस्थापक तुळशीदास गवस, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, कास सरपंच प्रवीण पंडित, गुरुनाथ सावंत, मीनल सावंत, कमलाकर धुरी, सिद्धार्थ पराडकर, समीर परब आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयासह विविध रक्तपेढ्यांमध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आयोजित या शिबिरात सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी दिसून आली. युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
दरम्यान, भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी शिबिराला भेट देऊन आयोजकांचे व रक्तदात्यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक संस्था, स्वयंसेवक आणि रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. समाजहितासाठी अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.


