कुडाळ : संपूर्ण राज्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीचा आपला माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल असतो. मात्र त्यानंतर इंजीनियरिंग, मेडिकल व इतर स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या परीक्षांमध्ये योग्य आणि अत्याधुनिक मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे आपल्या लाल मातीतील गुणवत्ता पुढे मात्र आपल्या यशात सातत्य राहू शकत नाही. त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि म्हणूनच कोकणातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये चमकावेत, मोठ्या पदावर जाऊन तसेच इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात समाधानकारक यश मिळविण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन योग्य वेळी मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक व कोकण सुपुत्र प्रा. राजाराम परब यांनी येथे व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कोकण विभागातील मानांकित अशा कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथील इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ‘यशस्वी भव’ फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘विज्ञान शाखेतील करिअरच्या वाटा’ या विषयावर मार्गदर्शन शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले.
यावेळी कोकणचे सुपुत्र प्रा. राजाराम महादेव परब (सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक, मोटिवेशनल स्पीकर) यांनी या मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांनी करिअर नेमके कसे निवडावे?, कोणत्या चुका टाळाव्यात?, इंजीनियरिंग, मेडिकल आणि फार्मसी या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नामांकित महाविद्यालये कोणती?, JEE, MHT-CET, NEET या प्रवेश परीक्षांची तयारी कशी करावी? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
या शिबिरात कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वालावलकर सर, उपप्राचार्य पी बी कदम सर, तसेच साळवी सर, चव्हाण सर आणि ए. ए. पाटील सर तसेच इतर मान्यवर कुडाळ हायस्कूलच्या वतीने उपस्थित होते. तसेच स्थानिक स्तरावर ‘परफेक्ट अकॅडेमी’च्या वतीने हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परफेक्ट अकॅडेमीच्या पूर्वी जाधव मॅडम, शीतल कांबळी मॅडम, परिमल सर व संदीप सिंग सर (IIT-BHU) आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता करताना, प्रशालेचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांचा ‘यशस्वी भव.!’ फाऊंडेशनच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच प्रा. राजाराम परब यांनी लिहिलेले ‘यशस्वी भव.!’ हे करिअर मार्गदर्शक पुस्तक त्यांना भेट म्हणून देण्यात आले.