कोलकाता : पश्चिम बंगाल येथे झालेल्या मोठ्या पराभवानंतर तृणमुल काँग्रेसमधील पडझड सुरुच आहे. रोज कोणी तरी पक्ष सोडत आहे किंवा राजीनामा देत आहे. ८० पैकी ५८ टीएमसी आमदारांनी बंडखोरी करीत नवा विरोधी पक्ष नेता निवडला आहे. या दरम्यान आता ममता बॅनर्जी दिल्लीतील राजकारणात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेत पराभूत झालेल्या ममता बॅनर्जी यांनी लोकसभेत जायचे आहे. सध्याच्या स्थितीनुसार ममता यांना लोकसभेत जाण्यासाठी आपल्या एखाद्या खासदाराकडून राजीनामा घ्यावा लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीएमसीचे बहरामपूर येथील खासदार युसूफ पठाण यांना ममता बॅनर्जीसाठी राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. परंतू त्यांनी नकार दिल्याचे समजते आहे.
लोकसभेत जाऊन संसदीय राजकारणात टीकून राहण्याचा ममता बॅनर्जी यांचा मार्ग सोपा राहिलेला नाही. ममता यांच्यासाठी युसूफ पठाण यांनी बहरामपूर जागेवरुन राजीनामा दिला तर तेथे पोट निवडणूक करुन ममता यांना तेथून निवडून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र यासाठी युसूप पठाण याने स्पष्ट नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे. बहरामपूर येथे ५० टक्क्यांहून अधिक मुस्लील लोकसंख्या आहे, त्यामुळे तेथून त्यांनी निवडणूक लढवली तर त्यांच्या साठी सर्वात सुरक्षित सीट असू शकते असे ममतांचे म्हणणे आहे. परंतू हा मार्ग सोपा नाही. कारण काँग्रेसचे माजी खासदार अधीर रंजन चौधरी देखील येथे अनेक वर्षे खासदार होते. त्यांना गेल्या लोकसभा निवडणूकीत युसूफ पठाण यांनी हरवले होते.
युसूफ पठाण यांनी राजीनामा दिला तरी ममतांसाठी ही निवडणूक जिंकणे सोपे राहिलेले नाही. कारण अधीर रंजन चौधरी देखील काँग्रेसच्या वतीने मैदानात उतरले तर जुने जाणते नेते असल्याने त्यांना याचा मोठा फायदा मिळेल. मात्र, आता तर मुळात युसूफ पठाण यांनी राजीनाम्या नकार दिला आहे. जोपर्यंत ममता बॅनर्जी कोणा दुसऱ्या खासदाराला राजीनामा देण्यास तयार करत नाहीत तोपर्यंत त्यांचे लोकसभेत पोहचणे अशक्य असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभेत टीएमसीचे २० खासदार पक्ष सोडण्याची तयारी करत आहेत.


