सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांचा गंभीर आरोप.; निर्णयामागील वस्तुस्थिती जाहीर करण्याची मागणी.
सावंतवाडी : सावंतवाडी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रभारी कार्यभाराच्या निर्णयांमुळे प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सावंतवाडी तहसीलदारांकडे असलेला उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) पदाचा प्रभारी कार्यभार अचानक काढून तो रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेले तथा तत्कालीन कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संपूर्ण घडामोडीमागे नेमकं काय दडलं आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी केला आहे.
गवंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर घारे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रभारी कार्यभार जिल्हा भूसंपादन अधिकारी शारदा पवार यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर त्या रजेवर गेल्याने हा कार्यभार सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे देण्यात आला. मात्र काही दिवसांतच तो काढून रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे.
गवंडे यांच्या मते, एकाच पदासाठी अल्पावधीत तीन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे कार्यभार देण्यामागे नेमका उद्देश काय होता, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. नुकत्याच झालेल्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने आजगाव-धाकोरे परिसरातील प्रस्तावित मायनिंगशी या बदल्यांचा काही संबंध आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
सावंतवाडीसारख्या महत्त्वाच्या उपविभागासाठी स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांऐवजी अन्य जिल्ह्यातील अधिकाऱ्याला अतिरिक्त जबाबदारी देण्याची आवश्यकता काय होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती आणि निर्णयामागील प्रशासकीय कारणे जाहीर करण्याची मागणी गवंडे यांनी केली आहे.
महसूल विभागातील या घडामोडींमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेत अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



