सावंतवाडी : “जिल्हा परिषद शाळाच माझ्या आयुष्याचा पाया आहे… त्या ऋणाची परतफेड करण्याची ही वेळ आहे,” अशी भावना व्यक्त करत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेने सावंतवाडीतील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ आणि ५ या दोन शाळा दत्तक घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केली. त्यांच्या या घोषणेचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा क्रमांक ४ येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत, “माझे शिक्षणही जिल्हा परिषद शाळेतच झाले आहे. आज याच शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे अथक परिश्रम आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करावा तेवढा कमीच आहे,” असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, छावा संघटना अध्यक्ष संतोष तळवणेकर, मुख्याध्यापक महेश पालव, साईनाथ जामदार, शेलेस्तीन फर्नांडिस, शिवा गावडे, ज्ञानेश्वर पारधी तसेच शिक्षिका पूजा शिंदे, अनघा निरवडेकर, लक्ष्मी धारगळकर, अंजना घाडी, प्रणिती सावंत, दक्षता गवस, वर्षा नाईक, शिल्पा जाधव, अंगणवाडी सेविका सरिता भिसे, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकारातून गौरव करण्यात आला. पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे व बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे आणि गुणवत्तेला बळ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक महेश पालव यांचा वाढदिवसही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सवात साजरा करण्यात आला. नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, पत्रकार हरिश्चंद्र पवार, विनायक गावस आणि छावा संघटनेचे अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक यांनीही शिक्षण क्षेत्राबाबत ठाम भूमिका मांडली. “भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीचे आम्ही अनुकरण करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या विकासात कोणतीही कमतरता राहू देणार नाही. रिक्त शिक्षक पदे लवकरात लवकर भरली जातील. तसेच या शाळेसाठी आणखी एका शिक्षकाची मागणीही सकारात्मकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांचा गौरव, शाळा दत्तक घेण्याची घोषणा आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबत दिलेली सकारात्मक आश्वासने यामुळे हा गुणगौरव सोहळा शिक्षण क्षेत्रासाठी आश्वासक आणि प्रेरणादायी ठरला.



