Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

सजग मतदार म्हणून मला अपेक्षित असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास! ; संवेदनशील शिक्षक कवी कमलेश गोसावी यांचे ‘चिंतन’.

मतदार म्हणून मला अपेक्षित असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास.

पारगड, आंबोली, फोंडा, बावडा
सह्याद्रीचे माथे
पायथ्याशी अरबी सागर
अतुट तयांचे नाते
इतिहासाची भूमी ही
भक्कम प्रत्येक किल्ला
लाल मातीतील स्वर्ग हा
माझा सिंधुदुर्ग जिल्हा!

गर्द हिरवा निसर्ग, चपळ निळ्या नद्या, फेसाळणारा निळाशार समुद्र, मोठी जैवविविधता, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक किल्ले, नारळ-सुपारी.. आंब्याच्या बागा, आदिमानवाची कातळ शिल्पे आणि बरेच काही.. म्हणजे सिंधुदुर्ग!

राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे, हवाई वाहतूक आणि काही छोटे-मोठे उद्योग याव्यतिरिक्त सिंधुदुर्गचा मोठा विकास झालेला नाही. बरं राष्ट्रीय महामार्ग कोकण रेल्वे यांचा फायदा सिंधुदुर्ग पेक्षा इतर राज्यांना अधिक आहे. हवाई वाहतुकीचा विचार केला तर सुरू झाल्यापासूनच तिची दयनीय अवस्था आहे. म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या प्रचंड साधनसंपत्तीचा व मनुष्यबळाचा उपयोग करून अधिक गतीने या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. यासाठी विकासाच्या अनेक नवनवीन दिशांवर लक्ष केंद्रित करून त्याचा उपयोग करणे आणि त्या दिशेने मार्गस्थ होणे ही काळाची गरज आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दिशा यावर चर्चा करताना जिल्ह्याचे नंदनवन झाले पाहिजे या अनुषंगाने जिल्ह्याला उध्वस्त करणारे उद्योग येथे न आणता शाश्वत विकास कायम ठेवणाऱ्या आणि स्थानिक मालांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची नांदी या जिल्ह्यात होणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये द्वितीय क्षेत्र महत्त्वाचं असलं तरी प्राथमिक क्षेत्र म्हणजे ‘शेती’ हा घटक सर्वात महत्त्वाचा असतो. 5207 चौ. कि. क्षेत्र लाभलेल्या आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने इथल्या शेतीमध्ये आधुनिक बदल अपेक्षित आहेत. मात्र रासायनिकतेला दूर ठेवणे गरजेचे आहे.

येथिल उकड्या तांदळाची पेज जिला आपण जगप्रसिद्ध ‘एनर्जी ड्रिंक’ बनवू शकलो तर येथील जमीन पुन्हा हिरव्या पातांनी सजू शकेल. इथल्या लाल मातीत हळद, आले, जायफळ, लवंग यासारखी मसाल्याची पिके मोठ्या प्रमाणात येतात. मात्र भारतातील औषधे निर्माण करणारे कारखाने आफ्रिका खंडातील देशांकडून लाखो टन हळद, आले, मिरी मागवतात. याला कारण म्हणजे आपल्या देशात युरिया खताचा होणारा मोठा वापर होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विषमुक्त शेती करून सेंद्रिय शेतीला चालना दिली आणि मोठ्या प्रमाणात हळद, आलं, मिरी आदी पिकवलं तर इथल्या औषधी गुणांमुळे त्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढेल आणि येथील शेतकरी पारंपारिक भात शेतीवर अवलंबून न राहता व्यापारी पिके घेईल. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतीच असल्याने शेती आणि शेती पूरक उद्योग व्यवसायावरच लक्ष केंद्रित करणे, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल. मुंबई पुण्यासारख्या शहरातही आज कुळीथ पिठ प्रसिद्ध झाले आहे. त्यासाठी लागणारा कुळीथ दिवसेंदिवस महाग होत आहेत. कर्नाटक राज्याकडून आपल्याला आयात करावी लागत आहे. जर मोठ्या प्रमाणात कुळीथ पिकाच्या दृष्टीने जिल्ह्यात लक्ष दिले गेले तर तोही उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असेल.

जगप्रसिद्ध हापूस आंबा, काजू, कोकम हे भौगोलिक मानांकन (G. I.) प्राप्त आहेत. ही पिके प्रचंड पैसे देणारी आहेतच पण नुसती पीक न घेता या फळांबरोबर फणस, जांभूळ, करवंद, चारोळ्या आदी फळ प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजेत. केरळच्या जेम्स जोसेफ यांनी फणसाच्या एका आठळीमध्ये चार बदामांमध्ये मिळणारे घटक असतात हे सिद्ध केले आहे. म्हणजेच फणसाच्या बिया ज्या वाया जातात त्यापासून ‘एनर्जी पावडर’ सारखे प्रॉडक्ट बनवता येणे शक्य आहे. इथल्या भौगोलिक मानांकन प्राप्त कोकम मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत पण पारंपारिक पद्धतीने त्याच्यावर पदार्थ निर्मिती न करता आधुनिकतेची जोड दिली तर कोकम प्रचंड पैसा देणारे पीक ठरेल. आज धावपळीच्या जगामध्ये अपचन, ऍसिडिटी ही नित्याची झालेली आहे. आपण अनेकदा ‘इनोची’ जाहिरात पाहत असतो. आपले कोकम जर पावडर फॉर्ममध्ये करून इनो सारखी पाऊच बनवली गेली तर साईड इफेक्ट नसलेलं आणि औषधी गुणधर्म देणारे प्रॉडक्ट म्हणून त्याची मागणी वाढेल. कोकमच्या बियांपासून ‘कोकम बटर’ जे औषधी आहे, त्याचेही उत्पादन वाढविले पाहिजे. वाया जाणार कोकम प्रचंड प्रमाणात पैसा मिळवून देईल. अशा प्रकारचे उद्योग निर्माण होणे ही या भूमीची गरज आहे. येथील नारळ, सुपारी, करवंद, चारोळ्या, सुरंगी ही सगळी पिकं विकासाच्या प्रक्रियेत आणून जलद गतीने इथल्या शेतकऱ्याला मजबूत करणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा काजूच्या झाडांपेक्षाही अनेक पटीने चारोळ्यांची झाड नैसर्गिकरित्या जंगलात उगवलेली आहेत पण या सगळ्या चारोळ्यांच्या बिया पडून नष्ट होतात. बाजारामध्ये हजार दीड हजार रुपये किलो चारोळ्यांचा दर आहे. या चारोळ्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग जिल्ह्यात सुरू झाले तर नक्कीच वाया जाणारी अशी अनेक पिकं प्रत्येक माणसाला विकासाच्या प्रक्रियेत घेतील.

अन्नप्रक्रिया उद्योगांबरोबर इतर पूरक उद्योग निर्मितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे अनेक फळांचे वेस्टेज उदाहरणार्थ नारळाच्या सोडण्यापासून काथ्या उद्योग, कोकोपीट उद्योग यांची एक-दोन युनिटे मर्यादित न ठेवता मोठ्या प्रमाणात क्लस्टरच्या स्वरूपात होणे गरजेचे आहे. येथिल नारळ पाण्यावर प्रक्रिया करून टेट्रा पॅक किंवा पावडर फॉर्ममध्ये निर्मिती करून त्याची सॅचेट उपलब्ध करून दिली तर मोठ्या प्रमाणात मागणी वाढेल. या जिल्ह्यामध्ये प्रत्येक नदीच्या किनारी औदुंबराचे अनेक वृक्ष आहेत. पारंपारिक पद्धतीने काढल्या जाणाऱ्या औदुंबराचं पाणी जर उद्योग म्हणून विकसित केला तर कॅन्सर सारख्या ट्रीटमेंटवर दिली जाणारी केमोथेरपी आणि त्यातून निर्माण होणारे उष्णतेचे विकार यावर हेच औदुंबराचे जल रामबाण ठरेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नैसर्गिक विविधता आहे. जगातील सुमारे 2500 वनस्पतींच्या जातींपैकी सिंधुदुर्ग मध्ये जवळपास 1100 जाती सापडतात. वनसपती विविधता आणि प्रचंड फुलोरा यामुळे इथल्या मधामध्ये औषधी गुणधर्म अधिक आहेत. मधनिर्मिती प्रकल्पाकडे मोठा उद्योग म्हणून बघणे हे आजची गरज आहे. याशिवाय काष्ठ वनौषधी उद्योग विकसित होऊ शकतो. डायबेटीसवर गुणकारी जांभूळ मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यात पिकत आहे. त्याच्या बियांची पावडर, फळांचा रस यावर प्रक्रिया करून डायबिटीसवर औषध निर्मितीचे प्रकल्प जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकं निर्मिती आहे पण साठवणूक क्षमता आणि तंत्रज्ञान नसल्यामुळे तेवढीच वाया जात आहे. महाराष्ट्रात लासनगांव व मुंबईच्या जवळ तुर्भे या दोन ठिकाणी इ-रेडीएशन सेंटर आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे इ- रेडिएशन सेंटर होणे गरजेचे आहे. ज्यामध्ये इथली सर्व पिके, कडधान्ये, फळे त्याचबरोबर इथे मिळणारे मासे, खेकडे, समुद्री अन्न हे इ-रेडिएशन केल्यास अनेक दिवस टिकेल आणि निर्यात करताना अधिक दर मिळेल. जिल्ह्यातील वाया जाणारा माल टिकवून त्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी इ-रेडीएशन तंत्रज्ञान हे आज जगातील एक उत्तम तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान जिल्ह्यामध्ये आणणे अत्यंत गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पारंपारिक मासेमारी हा मोठा व्यवसाय विकासाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा घटक आहे. आजकाल ‘पर्सनेट’ सारखे मासेमारीचे बदललेले स्वरूप या व्यवसायाची व्याप्ती वाढवत आहे. याचबरोबर कोळंबी पालन, खेकडे पालन, कालवं पालन यासारख्या मत्स्य शेतीचे प्रयोग सुरू झालेले आहेत. या व्यवसायालाही विकासाच्या दृष्टीने उभारी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा आणि अन्न निर्मिती करणारा हा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे.

कोकणच्या लाल मातीत बुद्धिमत्ता पिकते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या बुद्धिमत्तेला जागतिक प्रक्रियेत आणणे आणि रोजगार देणे हे मोठे आव्हान आहे. यासाठी आयटी पार्क जिल्ह्यात होणं आवश्यक आहे. सर्वसामान्य अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. डायलिसिस टेक्निशियन, इलेक्ट्रिकल टेक्निशियन एक्स-रे टेक्निशियन अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण इथल्या विद्यार्थ्यांना मिळालं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा तंत्रज्ञानाचा जिल्हा म्हणून ओळख होऊ शकते. शाळास्तरावरुन इंग्रजी भाषा व स्पर्धा परीक्षा अभ्यास या दोन गोष्टी राबवल्या गेल्या तर भविष्यात मोठ्या प्रमाणात इथले विद्यार्थी अधिकारी बनतील. आज जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झालेली आहेत पण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाच या महाविद्यालयांत शिक्षण मिळणे अपेक्षित आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक छोटे आणि गरीब देश अनेक खेळांमध्ये आपली तेजस्वी कामगिरी करताना दिसत आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर क्रीडा क्षेत्रात सर्वात मागासलेला जिल्हा म्हणजे आपला सिंधुदुर्ग होय. वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण केंद्रे जिल्ह्यात उभारून इथल्या क्रीडा गुणांना वाव देऊन क्रीडा नैपुण्य आंतरराष्ट्रीय पातळीवर आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही खेळांच्या अकॅडमी सुरू झाल्या नि काही दिवसांतच त्या बंद झाल्यात. करोडो रुपये क्रीडा संकुलासाठी खर्च झालेत पण क्रीडा क्षेत्रासाठी राजकीय व प्रशासकीय उदासीनता असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडताना दिसत नाही आहेत. याही गोष्टीचा विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा.

माणगाव खोरे बांबू शेतीसाठी उत्तम आहे. माणगा म्हणजेच बांबू. निवजे, हिर्लोक, वाडोस, गोठोस, आंबेरी हा पूर्ण पट्टा बांबू शेतीसाठी उत्तम आहे. ‘कॉन बॅक’ सारखी संस्था बांबू पासून वस्तू निर्मितीचे प्रयोग करीत आहे. या संस्थेसारखे इतर संस्थांनी बांबू पूरक उद्योगात यायला हवे.

कोंबडी पालन, शेळी पालन,पशुपालन व्यवसाय व त्या आधारित उद्योग विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. संपूर्ण जिल्ह्याची अंड्यांची एका आठवड्याची गरज जवळपास एक लाख एवढी आहे. माणगाव खोऱ्यातील मोरे, वाडोस, गोठोस ही गावे मोठ्या प्रमाणात अंड्यांचे उत्पादन करीत आहेत. यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील इतर गावांनीही अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये उत्पन्न मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षण, अल्प दराने वित्तपुरवठा आणि पाठबळ शासन स्तराकडून मिळणे खूप गरजेचे आहे.

खनिज संपत्तीने इथली भूमी भरलेली आहे. लोहखनिज, मॅगनीज, इल्मेनाईट, क्रोमाइट, बॉक्साईट, अभ्रक, चुनखडक, गेरू अशी खनिजे मोठ्या प्रमाणात या जमिनीत आहेत. निसर्गाचे संतुलन राखीत या खनिजांवर प्रक्रिया होणारे अवजड उद्योग धंदे जिल्ह्यामध्ये उभारले गेले पाहिजेत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईलच पण त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकासाची गती कित्येक पटीने वाढेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे पर्यटन. ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, निसर्ग पर्यटन, सागरी पर्यटन, साहसी पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन असे अनेक प्रकारचे पर्यटन आपल्या जिल्ह्यात भरभरून आहे. आज पर्यटनामध्ये मालवण, तारकर्ली, देवबाग अशी मोजकीच ठिकाणे विकसित झालेली दिसत आहेत. पण वर नमूद केलेल्या प्रकारांप्रमाणे येथील मंदिरे, इथले किल्ले, इथला निसर्ग, येथील जैवविविधता आदी घटक केंद्रस्थानी ठेवून पर्यटन स्थळे विकसित होणे गरजेचे आहे.

मी स्वतः तसेच इतर अनेक जण आदिमानवाच्या खुणा या जिल्ह्यात शोधत आहेत. या खुणा म्हणजेच अतिप्राचीन कातळशिल्पे होय. द. अमेरिकेतील पेरू देशातील ‘नाझका’ हे एकमेव कातळशिल्प जागतिक वारसा यादीमध्ये आहे. भारतामध्ये फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये एका ठिकाणी ही कातळशिल्पे सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडोपी, असरोंडी, किर्लोस, हेदूळ, ओवळीये, हिवाळे, देवगड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी असलेली कातळशिल्पे वारसा यादीत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. त्याचबरोबर या कातळशिल्पांचे जतन होणे गरजेचे आहे. ही कातळशिल्पे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणे गरजेची आहेत. जर असं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी गाव हे कातळ शिल्पांचे गाव म्हणून नावारुपास येत आहे तसेच सिंधुदुर्गातीलही ही गावं पर्यटनाच्या रुपाने जगप्रसिद्ध होतील. पर्यटनामध्ये आधुनिक बदल अपेक्षित आहेत. सागरी वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायविंग स्नाॅर्कलिंग हे आपल्या जिल्ह्यात बऱ्यापैकी सुरू आहेत. पण याच बरोबर हेलिकॉप्टर राईड, हॉट बलून सफर, जंगल सफर याही गोष्टी सुरू झाल्या तर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राचीन सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. इथले सण, उत्सव, जत्रा, कला, दशावतार, कळसुत्री बाहुल्या, गंजिफा खेळ आदी सर्व घटकांचा पर्यटनाच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने उपयोगात आणणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या नवीन दिशांचा विचार करत असताना, सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे इथल्या लोकांची विकासासाठी मानसिकता तयार करणे हा होय. त्याचबरोबर इथली राजकीय मानसिकता ती ही विकासासाठी अनुकूल करणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या दोन गोष्टी जर जुळून आल्या आणि वर विषद केलेल्या घटकांवर विचार व मंथन होऊन कार्यवाही झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण भारतातील एक विकसित व आदर्श जिल्हा ठरेल यात कोणतीही शंका नाही.

प्रस्थापित राजकीय नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याला आपला बालेकिल्ला समजत आहेत. प्रत्येक उद्योग स्व मालकीचा अथवा स्वतःची भागीदारी असलेला ही मानसिकता राजकीय नेत्यांनी बदलायला हवी. आपली गढी मजबूत करण्यापेक्षा हा बालेकिल्ला जर मजबूत झाला तर खऱ्या अर्थाने या नेत्यांना सलाम असेल.

विकासाच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शाश्वत विकास पर्यावरण पूरक असावा, एवढीच माफक इच्छा!

✍🏻कमलेश गोसावी
काळसे, मालवण
मो. 9421237887

(वरील विचार हे माझे व्यक्तिगत आहेत. ते काहींना पटतील.. काहींना पटणार नाहीत. कुणाला अजून काही मुद्दे त्यामध्ये समाविष्ट करायचे असतील तर करू शकता. लोकप्रतिनिधी म्हणून सिंधुदुर्गचा विकास कसा असायला पाहिजे?, हे या राजकीय लोकांना समजलं पाहिजे असं मला वाटतंय.)

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles