सावंतवाडी : तालुक्यातील बांदा – शेर्ले या तेरेखोल नदीवर पूल बांधावे, अशी मडूरा पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची अनेक वर्षाची मागणी जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून नदीवर फुल बांधून पूर्ण करण्यात आली आहे. या पुलामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षे दुर्लक्षित असलेली समस्या दूर झाल्याने ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरण खात्याचे ऋणही व्यक्त केले आहे. मात्र फुलाला जोडणारा दोन्ही बाजूचा रस्ता खराब झाल्याने रस्त्याचे दगड उखडून पडत आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात महेश उर्फ पप्पू खोबरेकर व ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरण खात्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हा मडूरा पंचक्रोशीची अनेक वर्षाची मागणी आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. आणि त्यासाठी आम्ही आपले ऋणी आहोतच. मात्र पुलाला जोडणारा दोन्ही बाजूचा रस्ता माती व खडीकरण खराब झाल्याने दगडामुळे सतत दुचाकीचे अपघात होत आहेत सदर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याच्या दूरदशेकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करून सनदशीर मार्गाने येत्या प्रजासत्ताक दिनी रस्त्या नाजिक उपोषण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याची कृपया नोंद घ्यावी, अशी विनंती त्यांनी या निवेदनात केली आहे.
या निवेदनावर पत्रकार मोहन जाधव, उपसरपंच दीपक नाईक यांच्यासह महेश उर्फ पप्पू खोबरेकर, राजेश चव्हाण, अंकुश जाधव ,विराज नेवगी, लवू सावळ, भारती चव्हाण, अजित शेर्लेकर, उमेश जाधव, रितेश जाधव, भिकाजी धुरी, अरुण धुरी, देऊ मळगावकर, अनिल मळगावकर, फजल रखानजी, अनिशा शेर्लेकर, चैतन्य चांदेकर अशा सुमारे 90 जणांच्या सह्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे. दरम्यान शेर्ले ग्रामपंचायतच्या शुक्रवारी पार पडलेल्या विशेष ग्रामसभेतही या रस्त्याबाबत चर्चा करून सर्व ग्रामस्थांनीही या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.