सावंतवाडी : बाळकृष्ण राणे यांनी ‘जास्वंदी’ हे कथासंग्रह लिहिले आहे. त्यांचे लिहिते हात खरंच एक वेगळीच अनुभूती आहे. मी त्यांना कॉलेज जीवनापासून पाहतो, ते एक उत्तम लेखक, वाचक आहे. सतत काहीतरी वाचत व लिहीत राहणे ही त्यांची कला खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी असेच सामाजिक, शोध लेखन करत राहावे, असे वक्तव्य सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकिशोर गवस यांनी येथे काढले.
सावंतवाडी येथील श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाच्या बी. एस्सी. १९८२ सालच्या बॅचच्या वतीने व मित्र मंडळाच्या वतीने लेखक बाळकृष्ण सखाराम राणे यांनी लिहिलेल्या ‘जास्वंदी’ या कथासंग्रहाचे पुस्तक प्रकाशन ज्येष्ठ लेखिका उषा परब यांच्या हस्ते सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिरात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री. गवस प्रमुख होते. पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष व पत्रकार अॅड. संतोष सावंत, सेवानिवृत्त प्राध्यापक विश्वास जोशी, लेखक बाळकृष्ण राणे, सौ. मनीषा राणे. रमाकांत केरकर, एन. एल. सावंत, प्रा. दिलीप गोडकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी श्री. गवस पुढे म्हणाले, बाळकृष्ण राणे हे डोंगरपाल हायस्कूलमध्ये गणित, विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘आधार’ व ‘चंद्रा’ पुस्तकेही लिहिली आहेत. आता ‘जास्वंदी’ हे कथासंग्रह लिहून आपली लेखणी अधिक व्यापकतेने पुढे आणली आहे. त्यांचे लिखाण म्हणजे सुंदरवाडी ग्रुपमधील व्यक्तींना मेजवानी असते
यावेळी ज्येष्ठ लेखिका साहित्यिक उषा परब म्हणाल्या, बाळकृष्ण राणे यांनी ‘जास्वंदी’ कथासंग्रहमध्ये विविध प्रकारचे लिखाण केले आहे. सर्व कथांमधून बोध घेणारे लिखाण त्यांचे आहे. त्यांनी असेच लिहीत जावे. शोध, बोध अशा सर्व अंगाने त्यांचे लेखन आहे. चांगले कथानक त्यांनी जास्वंदीच्या रुपात लिहिले आहे. त्यांनी लिहीत राहावे, सतत वाचते राहावे!, असेही त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित अॅड. संतोष सावंत म्हणाले, प्रत्येक व्यक्तित एक साहित्यिक दडलेला असतो. तो लेखक, वक्ताही असतो. फक्त त्याने आपल्यामधील गुण व्यक्त करायला हवेत. बाळकृष्ण राणे यांनी शिक्षकी पेशात असतानाही उत्तम प्रकारे ‘जास्वंदी’ हा कथासंग्रह लिहिला आहे.
यावेळी प्रा. जोशी यांनीही आपले विचार मांडले. यावेळी सन १९८२ सालच्या बॅचच्या वतीने बाळकृष्ण राणे व सौभाग्यवती राणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्प देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. दिलीप गोडकर यांनी केले. सूत्रसंचालन साहित्यिक विनय सौदागर यांनी केले तर आभार रमाकांत केरकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला सुंदरवाडी ग्रुपचे सदस्य तसेच १९८२ बॅचचे प्रदीप पेडणेकर, सुखदा पेडणेकर, वर्षा सापळे, उमा वराडकर, सौ. राणे, संप्रवी कशाळीकर, मानसी प्रभू, विजय कांबळे, विलास परब, भरत गावडे, रमाकांत केरकर, रोहिणी कांबळे, सौ. केरकर, विना परब, अरुण धर्णे, हेमंत झांट्ये, श्रीकृष्ण प्रभू, विद्या जडये, चंद्रशेखर नाडकर्णी, मोतीराम टोपले, नंदू देसाई, विनोद गावकर, मंगल प्रभू, प्रा. सुषमा मांजरेकर, राम वाडकर, आनंद परुळेकर, विजय देसाई., गुरु राऊळ आदी उपस्थित होते. बाळकृष्ण राणे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे मित्र-परिवार यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.


