सावंतवाडी :
✹ १२ नोव्हेंबर ✹
थोर अर्थतज्ज्ञ प्रा. मधू दंडवते स्मृतिदिन
जन्म – २१ जानेवारी १९२४ (अहमदनगर aatach)
स्मृती – १२ नोव्हेंबर २००५ (मुंबई)
समाजवादी नेते, अर्थतज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते यांचा जन्म तत्कालीन अहमदनगर व आताचे अहिल्यानगर येथे झाला. ‘साधी राहणी, उच्च विचारसणी’ अंगीकारणारे प्रा. मधु दंडवते होते. आणि कोकण रेल्वेचं अशक्यप्राय स्वप्न पाहताना विरोधकांची होणारी बोचरी टिका हिमालया प्रमाणे शांत आणि स्तब्ध राहुन सहन करणारे ‘आधुनिक युगातील महात्मा’ दंडवतेच होते. मधू दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांनी कोकणात समाजवादी बालेकिल्ला उभारला. कोकणात समाजवादी विचारसरणी काही काळ रुजली आणि फोफावलीही. हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला. प्रा.मधु दंडवते यांनी एमएससी केल्यानंतर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई येथे भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि मुख्य भौतिकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मध्ये काम केले. दंडवते मूळचे नगरचे होते. पण बॅरिस्टर नाथ पै यांच्या निधनानंतर त्यांनी कोकण हीच आपली कर्मभूमी मानली. कोकणातील राजापूर मतदारसंघाचे अनेक वर्षे त्यांनी संसदेत प्रतिनिधीत्व केले. आपल्या समाजवादाची सुरवात त्यांनी अहमदनगर पासून केली. १९४२ च्या स्वातंत्र लढ्यात भाग घेतला होता. अर्धशतकाहून अधिक काळ राजकारण व समाजकारणात सक्रिय राहिलेले समाजवादी नेते प्रा. मधू दंडवते यांची एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ख्याती होती.
१९७१ ते १९९० एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. विनोद व बोचरा उपरोध असणारी त्यांची संसदेतील भाषणे सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांवर कठोर टीका करणारी असत. १९७८ साली जनता पक्षाच्या राजवटीत रेल्वेमंत्री, १९८९ साली व्ही.पी.सिंह सरकारमध्ये अर्थमंत्री आणि १९९० साली देवगौडा पंतप्रधान असताना नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपदी त्यांनी काम केले होते. ध्येयवादी, स्वच्छ चारित्र्याचे नेते म्हणून दिल्लीत इतर राजकारण्यांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप होती. रेल्वेमंत्री असताना काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील रेल्वेत लाकडी फळ्या बदलून त्यावर दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले. भारतीय रेल्वेचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल तेव्हा त्याचे दंडवते रेल्वेमंत्री बनण्यापूर्वीचा कालखंड आणि दंडवते रेल्वेमंत्री झाल्यानंतरचा कालखंड असे दोन भाग निश्चितच पडतील. १९७७ मध्ये दंडवते केंद्रीय रेल्वेमंत्री झाले. त्यापूर्वी रेल्वेमध्ये फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या बैठक व्यवस्थेत जमीन आसमानाचा फरक होता. सेकंड क्लास मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कठीण लाकडापासून बनलेल्या बाकावर बसून आणि झोपून प्रवास करावा लागत असे. सामान्य जनतेशी नाळ जोडलेल्या दंडवतेना लोकांचे हे हाल सहन होणे शक्यच नव्हते. त्यासाठीच भारतीय रेल्वेच्या इतिहासातील क्रांतिकारक निर्णय नानांनी घेतला. सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय दंडवतेंनी करून दिली. दंडवतेंच्या याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरिब लोक सेकंड क्लास मधून आरामदायक प्रवास करू शकतात.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उतार देताना दंडवते म्हणाले होते, “मला फर्स्ट क्लासचे महत्व कमी करायचे नाही, मला सेकंड क्लासचा प्रवास सुखकर करायचा आहे.” अशक्यप्राय कोकण रेल्वे पुर्णत्वास नेल्यानंतर लगेचच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने प्रा. मधु दंडवतेना पराभुत करुन परतफेड केली. कर्मधर्म संयोगाने त्याच वेळी दंडवतेना देशाचा पंतप्रधान बनण्याची नामी संधी चालुन आली होती. राज्यसभेतुन निवडुन जात पंतप्रधानपद स्वीकारण्याचे सल्ले मिळाल्यावर तत्वांचा पुजारी विनम्रतापुर्वक पंतप्रधानपद नाकारताना म्हणाले होते, “मागच्या दरवाजाने (राज्यसभेतुन निवडुन जात) पंतप्रधानपद स्वीकारण मला मान्य नाही. माझ्या लोकांनी मला नाकारलं. तिथेच माझ राजकरण संपल.” देशाच्या अर्थमंत्रीपदी असलेले दंडवते मंत्रीपदावरुन पायउतार झाल्यावर गाडी विकत घेण्यासाठी कर्जाकरिता बँकेची पायरी चढले कारण दंडवतेनी राजकरणातुन स्वतःसाठी कधीच पैसा कमावला नाही. आपल्या कार्यकर्त्यानाही त्यांनी कधी पैसा उभारु दिला नाही. त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. मधु दंडवते यांचे चिरंजीव उदय दंडवते हे अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्को येथे डिझाइन रिसर्च कन्सल्टिंग क्षेत्रात काम करतात. सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचे ते समर्थक आहेत. मधू दंडवते यांचे मुंबईत निधन झाले. त्यांनी दहना ऐवजी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे मृत्यु नंतर जे.जे. हॉस्पिटलला त्यांचा देह दान करण्यात आला.


