सावंतवाडी : भीमगर्जना युवक मंडळ, रमाईनगर (इन्सुली) यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरात लोकराजे, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
मंडळाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास प्रारंभ झाला. ह्यूमन राइट्स कोकण विभागाचे उपाध्यक्ष आनंद जाधव, मंडळाचे सचिव धम्मचारी लोकदर्शी तसेच महिला मंडळाच्या वृषाली जाधव आणि सविता जाधव यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी धम्मचारी लोकदर्शी यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. अस्पृश्यता निर्मूलनासाठी कायदा करणारे भारतातील पहिले राजे म्हणून शाहू महाराजांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणे, शिक्षण व नोकरीत आरक्षणाची अंमलबजावणी, शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज व दुष्काळी कर्जमाफी अशा अनेक लोककल्याणकारी निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला.

याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांचा हत्तीवरून सत्कार करून संपूर्ण कोल्हापूर शहरात साखर वाटल्याचा ऐतिहासिक प्रसंगही त्यांनी उपस्थितांना सांगितला. तसेच, “माझी जयंती साजरी करण्यापेक्षा आपले राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दिवाळीसारखी मोठ्या उत्साहात साजरी करा,” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करून दिली.
कार्यक्रमास कृष्णा जाधव, दिपेश जाधव, तन्मय जाधव, संजना जाधव, अनुजा जाधव, स्मिता जाधव, लैला जाधव, ललिता जाधव, सृष्टी जाधव, सेजल जाधव, दीपाली जाधव, प्रद्युम जाधव, यज्ञेश जाधव, अमृत जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी केले, तर आभार योगेश जाधव यांनी मानले.



