नवी दिल्ली : टीम इंडियाचा बॉर्डर – गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात पराभव झाला. टीम इंडियाने या पराभवासह ही मालिका 1-3 अशा फरकाने गमावली. तसेच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीच्या अंतिम फेरीतून बाहेर झाली. आता टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत 6 संघांविरुद्ध एकूण 18 कसोटी सामने खेळणार आहे. नियमांनुसार टीम इंडियाला मायदेशात 3 तर परदेशात 3 कसोटी मालिका खेळायच्या आहेत.

टीम इंडिया या तिसऱ्या साखळीतील मोहिमेची सुरुवात इंग्लंड विरुद्ध करणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान ही मालिका पार पडेल. त्यानंतर टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये मायदेशात विंडीजविरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडिया या साखळीतील तिसऱ्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करणार आहे. दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यात एकूण 2 कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेचं आयोजन हे नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. टीम इंडिया त्यानंतर 2026 मध्ये ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाला श्रीलंकेनंतर न्यूझीलंड दौरा करायचा आहे. भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 दरम्यान 2 कसोटी सामने खेळणार आहे. तर टीम इंडिया या साखळीतील शेवटची मालिका मायदेशात खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारत दौऱ्यावर येईल. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 5 सामने खेळवण्यात येतील. ही मालिका जानेवारी ते फेब्रुवारी 2027 दरम्यान पार पडेल.


