सावंतवाडी तालुक्यातील वीज ग्राहकांच्या बैठकीचे उद्या नगरपालिकेच्या पत्रकार कक्षा शेजारील सभागृहात आयोजन ! ; सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठकही उद्याच होणार!

सावंतवाडी : तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून पाऊस तोंडावर येऊनही वीज वितरण कडून म्हणावी तशी पावसाची तयारी झालेली नाही. त्यामुळे निद्रिस्त असलेल्या महावितरणला जाग आणण्यासाठी आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील समस्या मार्गी लावण्यासाठी, जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या लेखी तक्रारी घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील वीज ग्राहकांची महत्वाची बैठक गुरुवार दिनांक १७/४/२०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या पत्रकार कक्षाच्या शेजारील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला तालुक्यातील वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्र.जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे. याचवेळी सकाळी ११.०० वाजता जिल्हा कार्यकारिणीची बैठक त्याच ठिकाणी होणार आहे. या बैठकीला सर्व तालुकाध्यक्षांसह कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहण्याचे देखील सूचित करण्यात आले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव पंचक्रोशीतील समस्यांबाबत मळगाव येथे मागील आठवड्यात बैठक घेतली होती. परंतु तात्काळ समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊनही समस्या जैसे थे असल्याने मळगाव परिसरातील वीज ग्राहक नाराज आहेत. अशीच परिस्थिती आंबोली पासून सह्याद्री पट्ट्यातील सरमळे, दाभिल, मडूरा अशा अनेक गावांची आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचा खेळखंडोबा सुरू असून जुनाट असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे स्फोट होण्याच्या घटना देखील तालुक्यात दोन ठिकाणी घडल्या असून वीज ग्राहकांची विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. शेतात आग लागण्याचे देखील प्रकार होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. इन्सुली येथून तिलारी कालव्याच्या बाजूने ओटवणे करीत वेगळी लाईन मंजूर असूनही कामाला विलंब होत आहे. खुद्द सावंतवाडी शहरात दिवसातून दहावेळ वीज गायब होते. अशा अनेक समस्या आ वासून उभ्या असल्याने महावितरणला जागे करण्याची वेळ आली आहे. त्याकरिता ग्राहकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात उपकार्यकारी अभियंता सावंतवाडी यांजकडे देऊन त्याची एक प्रत वीज ग्राहक संघटनेकडे द्यावी. संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचे योग्य ते प्रयत्न केले जाणार आहेत.
येत्या काहीच दिवसात कुडाळ-मालवण मतदारसंघ, कणकवली मतदारसंघ विभागांमध्ये देखील वीज ग्राहकांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी विजेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा वीज ग्राहक संघटना प्रयत्नशील असून ग्राहकांनी योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन प्र.जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles