सावंतवाडी : शहरामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळणे, हे कृत्य अत्यंत हास्यास्पद आहे. एका प्रादेशिक पक्षाचे पदाधिकारी जिथे राष्ट्रीय सत्ताधारी पक्ष कुठेही आपली भूमिका मांडली नाही, अशा देशपातळीवरच्या भारत – अमेरिका व्यापार करारावरती बोलण्यासाठी धाडस करतात. एका राष्ट्रीय विरोधी पक्षाच्या नेत्यावरती बोलताना आपण अर्थशास्त्र आणि आपली उंची आणि अभ्यास करून वागणं गरजेचं होतं. असं म्हणतात “सूर्यावरती उडवलेली थुंकी ही परत स्वतःच्याच तोंडावरती पडत असते”. आमचे नेते राहुल गांधी नेहमी सत्य बोलतात. ते हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले, उच्चशिक्षित आणि सर्वगुणसंपन्न विपक्षचे नेते आहेत. ज्यांचं नाव भावी पंतप्रधानांच्या यादीमध्ये आहे, अशा नेत्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांकडून अशा वाईट कृत्याबद्दल कीव येते अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. साक्षी वंजारी यांनी दिली आहे.
संजू परब यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि मग एवढ्या मोठ्या नेत्यावरती कृत्य करताना विचार करावा. त्यापेक्षा जगभरात सुरू असलेलं एपिस्टंन फाईल प्रकरण यावरती आंदोलन केली तर जास्त बरं झालं असतं, असाही टोला साक्षी वंजारी यांनी लगावला आहे.
एक देशाचे सुजाण नागरिक म्हणून या महाराष्ट्र राज्यात खास करून मुंबई शहरात रोज बेपत्ता होत असणाऱ्या लहान मुली, महिला यांच्याविषयी जागरूकता दाखवली तर ते जास्त आवडेल. भविष्यात या प्रकरणावरती लवकरच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आंदोलनं होतील. राजकारणातलं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न यापुढे शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी करू नये. शिंदे सेनेला कुठेही युती केल्याशिवाय अस्तित्व नाही. सावंतवाडीत लोकांनी नाकारलेली सत्ता आणि सत्तेत केलेला बदल किमान यावरून तरी बोध घ्यावा. नगरपालिका निवडणुकीत केलेल्या टीका-टिपणीमुळे झालेले शिंदे सेनेचे नुकसान याचा विसर जर जिल्हाध्यक्ष व नेत्यांना पडलेला असेल तर आपल्या पदाधिकाऱ्यांची विचार करण्याची कुवत या कृत्यामुळे शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तपासावी, असा जोरदार टोला सौ. साक्षी वंजारी यांनी लगावला आहे.
राहुल गांधी यांचा पुतळा जाळणे ही केवळ निषेधाची कृती नाही, तर ती लोकशाहीचा अपमान आहे. मतभेद असू शकतात, पण अशा प्रकारे द्वेष आणि असहिष्णुता पसरवणे अजिबात सहन केले जाणार नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोणत्याही प्रकारच्या धमक्या, भीतीचे राजकारण किंवा हिंसक प्रवृत्तीसमोर झुकणार नाही. आम्ही संविधानावर विश्वास ठेवतो आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच या कृत्याचा तीव्र निषेध करतो.
ज्यांनी ही कृती केली आहे, त्यांनी लक्षात ठेवावे, विचारांची लढाई रस्त्यावर पुतळे जाळून जिंकता येत नाही. आम्ही अधिक ताकदीने जनतेसमोर जाऊ आणि लोकशाही मूल्यांसाठी आमचा संघर्ष अधिक जोमाने सुरू ठेवू, असेही सौ. वंजारी म्हणाल्या.



