मुंबई : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रताप गाजत असतानाच आता मुंबईतही एका भोंदूबाबाविरोधात तक्रार झाली आहे. मुंबईच्या मालाड भागातील भोंदूबाबा दर गुरूवारी आणि रविवारी तो भूत उतरवण्याची बतावणी करत अघोरी पूजा करतो. जादूटोणा, अघोरी पूजा यामुळे त्याच्या आजूबाजूला राहणारे स्थानिक लोक हैराण झाले. त्यामुळे या भोंदूबाबाला अटक करावी अशी मागणी स्थानिकांनी केलीय. आतापर्यंत त्याच्या घरी, घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप तो करत होता. मात्र 4 एप्रिलला त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचे काही फोटोज व्हिडिओ सुद्धा आता समाज माध्यमांमध्ये आले आहेत.
भोंदूबाबा त्याच्या पूजा साहित्यात बकऱ्याचा कलेजा, काळं कापड, लाल कापड, स्मशानातली राख, लिंबू, टाचणी, दारूची बाटली, कुंकू, सिगरेट अशा वस्तू घेतो. चार रस्ते जिथे मिळतात तिथे तो पूजा झाल्यावर या वस्तू फेकत असे. जादुटोण्याच्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये विशेषतः महिला, मुलांमध्ये घबराटीचं वातावरण होतं. मात्र एवढे प्रकार सुरू असूनही पोलिसांचं या रिदम पांचाळ नावाच्या भोंदूबाबाकडे दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित झाला आहे. भोंदूबाबाचा सदर सगळा प्रकार, ह्या अघोरी विद्याचे व्हिडिओ या स्थानिकांनी दोन आठवड्यापूर्वीच पोलिसांना दिले आणि स्थानिकांनी सह्या करत यावर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली. कारण त्याच्या या आघोरी पूजेमुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. वारंवार सांगून सुद्धा तो आपला हा कार्यक्रम थांबवत नसल्याने स्थानिकांना पोलिसांमध्ये धाव घ्यावी लागली. ही एक प्रकारे देवीची पूजा असल्याचं हा भोंदूबाबा त्याला या सगळ्या आरोपावर प्रश्न विचारल्यावर सांगतो.
पूजेसाठी कोणकोणते साहित्य वापरतो?
काळे कापड
लाल कापड
स्मशान राख
लिंबू
टाचणी
दारूची बाटली
कुंकू
सिगारेट
(चार रस्ते मिळतात तिथे ठेवायचं.)
‘मी पूजा करुन लोकांची सेवा करतो!’ – भोंदूबाबा.
पूजेचे साहित्य बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा या पूजेची भीती वाटेल आणि हा एक प्रकारे ब्लॅक मॅजिकचाच म्हणजेच जादूटोण्याचा प्रकार आहे हे तुमच्या लक्षात येईल. मात्र अशाप्रकारे राजरोसपणे सुरू असताना पोलिसांचे याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित केला जातोय. या सगळ्यावर या रिदम पांचाळशी आम्ही त्याच्याशी संपर्क साधून त्याचं म्हणणं जाणून घेतलं तर त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले. अशाप्रकारे कुठलाही जादूटोणा मी करत नाही, तर मी एक प्रकारे पूजा करत लोकांची सेवा करतो आणि त्यातून एक रुपयाही कमवत नाही असं तो म्हणतो.. उलट त्यांचा त्रास मी दूर करतो असा दावा त्यांनी केला आहे.
सुशिक्षित लोक बळी पडताय –
मुंबई जी कधीही झोपत नाही म्हणतात. जी कधीही शांत नसते. जिथे नेहमी वर्दळ असते. अशा दाट वस्ती असलेल्या मुंबईमध्ये अशाप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी गोष्ट घडते. ही फक्त आताच घडतीये असं नाही तर मागील अनेक दिवसांपासून घडते. त्याला अनेक सुशिक्षित लोक बळी पडताय आणि याला खत पाणी देतात हे एक प्रकारे दुर्दैव आहे. त्यामुळे अशा वृत्तीला त्या ठिकाणीच थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्यासारख्यांनी डोळे उघडे ठेवून हे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणे सुद्धा तितकेच महत्वाचं आहे. यावर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात?, हे पहावं लागेल.



