सावंतवाडी : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा, अपंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर तसेच अनाथ मुलांसाठीच्या विविध अर्थसहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी ३० जूनपूर्वी ऑनलाइन हयात दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा शासनाकडून मिळणारे अर्थसहाय्य थांबण्याची शक्यता असल्याची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिली.
शासनाच्या नव्या निर्णयानुसार ‘बीएसए’ (Beneficiary Satyapan App) या अॅपच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे ऑनलाइन सत्यापन करण्यात येणार आहे. यापूर्वी १ एप्रिलपासून तलाठी कार्यालयामार्फत ऑफलाइन हयात दाखला दिलेल्या लाभार्थ्यांनाही नव्याने ऑनलाइन हयात दाखला सादर करावा लागणार आहे.
यासाठी लाभार्थ्यांनी सेतू सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र किंवा तलाठी कार्यालयात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. वृद्ध, अंथरुणाला खिळलेले, अंध, अपंग, मूकबधिर व कर्णबधिर लाभार्थ्यांसाठी कोतवालामार्फत घरी जाऊनही ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
ऑनलाइन हयात दाखला देताना लाभार्थ्यांनी आधार कार्ड, बँक किंवा पोस्ट खात्याचे पासबुक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक तसेच अपंग व्यक्तींनी शासनाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा क्यूआर कोड सोबत ठेवणे आवश्यक आहे. केंद्रावर लाभार्थ्याच्या चेहऱ्याचे डिजिटल पडताळणी (फेस रीडिंग) करून ऑनलाइन सत्यापन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
शासनाने या सेवेसाठी ५० रुपये शुल्क निश्चित केले असून, ३० जून ही अंतिम मुदत आहे. दरवर्षी १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत हयात दाखला देणे बंधनकारक आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला दर पाच वर्षांनी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन हयात दाखला वेळेत न दिल्यास लाभार्थ्यांच्या बँक अथवा पोस्ट खात्यात जमा होणारे अर्थसहाय्य रोखले जाऊ शकते. त्यामुळे संबंधित लाभार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते, बचत गट आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करून लाभार्थ्यांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करावी, असे आवाहन राजेंद्र मसुरकर यांनी केले आहे.



