मुंबई : राज्यात मागील चार पाच दिवसात जोरदार पाऊस झाला. अनेक भागात दरड कोसळल्या. सखल भाग पाण्याखाली गेली होती. अनेक धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. राज्यात मॉन्सून उशिराने दाखल झाला. मात्र, पाच ते सहा दिवसात धुव्वाधार बरसला. जून महिन्यात जितका पाऊस होतो, तेवढा पाऊस सहा दिवसात झाला. थेट धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. आजही काही भागात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. सातारा, पुणे घाटमाथा या परिसरात पावसाचा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. केरळच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आजही काही जिल्ह्यात पाऊस विजांसह हजेरी लावेल. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी पावसाचा जोर कमी होतोय. राज्यातून पाऊस ओसरताना दिसत आहे.
मॉन्सून देशभरात दाखल झाला. एक ते दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यात यंदा पाऊस जास्त होणार नसल्याचा अंदाज होता. मात्र, पहिल्याच दणक्यात नद्यांना पूर आले. जुलै महिन्यात पाऊस चांगला होण्याचा अंदाज आहे. आजही काही भागात पाऊस कोसळेल.
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांच्या पाऊस झाला. सध्या चांदोली धरण 58.66 टक्के भरले असून धरणात 20.18 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे वारणा नदीने धोक्याची पातळी गाठली होती. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने नदीची पाणीपातळी आता घटू लागली असून नदीकाठच्या परिसरातील पूरस्थिती हळूहळू निवळण्यास मदत होत आहे.
जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे वडज धरणातून मीना नदी पात्रात 10000 क्युसेकने पाणी सोडल्यामुळे मीना नदीने रौद्र रूप धारण केले आहे. नारायणगाव येथील मेहेर पुल, नेवकर पुल, केटी बंधारे, आठवडे बाजार तळ पाण्याखाली गेले आहेत.अनेक ठिकाणी शेत जमिनीत पाणी साचले आहे तर ग्रामपंचायत नारायणगाव व वारुळवाडी, यांच्यामाध्यमातून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे



