वीरांच्या मनगटावर विद्यार्थ्यांच्या प्रेमाची राखी, वृक्षांनाही बांधली रक्षासूत्रे! ; शिरशिंगे शाळेत अनोखे रक्षाबंधन!, माजी सैनिकांप्रती कृतज्ञता अन् वृक्षसंवर्धनाचा जागर!

सावंतवाडी : सीमेवर डोळ्यांत तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करत, त्यांच्या मनगटावर विद्यार्थ्यांच्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची राखी बांधण्यात आली. शिरशिंगे येथील श्रीदेवी पावणाई रवळनाथ विद्यामंदिरात रक्षाबंधनाचा सण देशरक्षणासाठी आयुष्याचा अमूल्य काळ समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांच्या सन्मानाने आणि वृक्षसंवर्धनाच्या अनोख्या संदेशाने भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला.

शाळेतील आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या राख्या माजी सैनिकांच्या मनगटावर बांधत त्यांच्या देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या निरागस हातांनी बांधलेली राखी आणि त्यामागील देशभक्तीची भावना पाहून उपस्थित माजी सैनिकही भारावून गेले.

याचवेळी प्रशालेच्या प्रांगणातील वृक्षांनाही विद्यार्थ्यांनी राख्या बांधून ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण जपा’चा संदेश दिला. माजी सैनिकांच्या त्यागाची आठवण आणि निसर्गाच्या संवर्धनाची जबाबदारी यांचा सुंदर मिलाफ या उपक्रमातून घडून आला.

‘जवानांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित!’

“सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांमुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित आणि सुखाने जगू शकतो. आपल्या आयुष्यातील मोलाचा काळ देशसेवेसाठी अर्पण करणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात सैनिकांविषयी आस्था, आदर आणि अभिमान निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला,” असे मुख्याध्यापक राहुल समुद्रे यांनी सांगितले.

‘मोबाईलपासून दूर राहा, फिटनेसला प्राधान्य द्या!’

उपस्थित माजी सैनिक तथा गावचे सरपंच दीपक राऊळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना जीवनातील शिस्तीचा कानमंत्र दिला. मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहा, स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्या आणि मोबाईलचा वापर केवळ अभ्यासासाठीच करा, असा सल्ला त्यांनी दिला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे तंतोतंत पालन करून शिस्तबद्ध जीवन जगण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

माजी सैनिक संजय राऊळ यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत देशाच्या रक्षणाबरोबरच अन्नदात्या शेतकऱ्यांप्रतीही आदर व्यक्त केला. त्यांच्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

देशभक्तीच्या संस्कारांची भावी पिढीकडे मशाल!

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ माजी सैनिकांच्या मनगटावर राखी बांधली नाही, तर देशासाठी त्याग करणाऱ्या वीरांच्या शौर्याला मानवंदना देत कृतज्ञतेचे रक्षासूत्र बांधले. त्याचवेळी वृक्षांना राखी बांधून निसर्गाच्या संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारली. त्यामुळे शिरशिंगे शाळेतील हे रक्षाबंधन देशप्रेम, कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा त्रिवेणी संगम ठरले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक चंद्रकांत राऊळ, नारायण राऊळ, शांताराम राऊळ, दीपक राऊळ तसेच मुख्याध्यापक राहुल समुद्रे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमन राऊळ यांनी केले, तर आभार सायली परब यांनी मानले.

यावेळी शिक्षिका सौ. संध्या पवार, शिक्षकेतर कर्मचारी संतोष राणे, विठ्ठल धोंड, आबा डोईफोडे, संदीप जाधव, शरयू धोंड यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरशिंगे शाळेतील या अनोख्या रक्षाबंधनाने ‘राखी फक्त नात्यांना जोडत नाही, तर देशप्रेम, कृतज्ञता आणि निसर्गाशी असलेले आपले नातेही घट्ट करते,’ हा प्रेरणादायी संदेश दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles