जनतेने वारंवार नाकारलेल्यांची केसरकरांवर बोलण्याची पात्रता नाही : संजू परब.
सावंतवाडी : महाविकास आघाडीचे सावंतवाडीतील उमेदवार राजन तेली, परशुराम उपरकर, सतीश सावंत, बबन साळगावकर या सर्वांनाच जनतेने वेळोवेळी झिडकारले आहे. उपरकर व साळगावकर यांचे तर दोन दोन वेळा डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांच्यासारख्या जनतेतून तीन-तीन वेळा निवडून आलेल्या व आता चौथ्यांदाही निश्चितपणे विजयी होणार असलेल्या केसरकरांवर बोलण्याची पात्रता नाही. त्यामुळे आपली उरली सुरली किंमत वाचवायची असेल तर त्यांनी आपली तोंड बंद ठेवावे, अशी टिका शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी केली.
दरम्यान, अपक्ष उमेदवार विशाल परब यांचे कथित हल्ला प्रकरण हे केवळ स्टंटबाजी असून ती व्यक्ती पूर्वी विशाल परब यांच्या घरीच काम करत होती. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करावा असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत परिक्षीत मांजरेकर, सत्यवान बांदेकर, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणूक तसेच जिल्हा बँक निवडणुकांमध्ये जे वारंवार पराभूत झाले आहेत. असे जनतेने झिडकारलेले लोक एकत्र येऊन केसरकरांवर टीका करत आहेत हे हास्यास्पद आहे. बबन साळगावकर यांना येथील जनतेने दोन वेळा नाकारले आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत मी त्यांचे डिपॉझिट जप्त केले. तर विधानसभा निवडणुकीतही केसरकर यांनी त्यांचे डिपॉझिट जप्त केले. परशुराम उपरकर यांचेही दोन वेळा डिपॉझिट जप्त झाले आहे. तर तेली यांचा केसरकारांसमोर सलग दोन वेळा पराभव झाला असून आता ते पराभवाची हॅट्रिक करणार आहेत. दुसरीकडे दीपक केसरकर यांना तब्बल तीन वेळा इथल्या जनतेने निवडून देऊन या ठिकाणी इतिहास घडवलेला आहे. त्यामुळे उगाच केसरकरांवर टीका करून आपली उरली सुरली किंमतही त्यांनी घालवू नये, असा उपरोधिक सल्ला संजू परब यांनी दिला.
बबन साळगावकर हे सातवी नापास असून केसरकर यांनीच त्यांना नगराध्यक्ष केले आहे. तर उपरकर यांची ब्लॅकमेलर अशी ओळख आहे. वसुली करण्यात काही जणांचा एक नंबर आहे. त्यामुळे उगाच त्यांनी एकत्र येत ताकद अजमावण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही तोंड उघडलं तर यांना जनतेत तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे त्यांनी आपली उरली सुरली किंमत वाचवायची असल्यास केसरकर यांच्यावर पुन्हा बोलण्याचे धाडस करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी
दिला.
दरम्यान, अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यावरील कथित हल्ला प्रकरण हे केवळ स्टंटबाजी आहे. माझ्या एवढा कोणीच त्यांना जवळून ओळखत नाही. स्टंटबाजी करून जनतेची मते मिळत नाही त्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करावे लागते. असं दाखविण्यासारखं कोणतंच काम नसल्याने केवळ पैशाच्या जोरावर ही निवडणूक आपण जिंकणार या तोऱ्यात ते फिरत आहेत. त्यामुळे जनतेने अशा लोकांपासून सावध राहावे, असेही ते म्हणाले.
कथित हल्लाप्रकरणी पुढे आणलेला व्यक्ती विशाल परब बंगल्यावरील : संजू परब
विशाल परब यांनी आपल्या गाडीवर हल्ला केला म्हणून ज्या व्यक्तीला पुढे केले आहे ती व्यक्ती पूर्वी विशाल परब यांच्या बंगल्यावर बागेत काम करण्यासाठी होती. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करीत परब यांच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास हा प्रकार उघड होईल. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करावा अन्यथा याबाबत आपल्याला गृह मंत्रालयाचे लक्ष वेधावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.