सावंतवाडी : आदरणीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली महायुती पुन्हा एकत्रित आणण्याचं काम एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या दोघांची जोडी राज्यात विधायक काम करत आहे. अनेक विकासकामे युती सरकारने केली. ते पाहून अजित पवार देखील सरकारमध्ये सहभागी झाले. लोकहिताचे काम करणारे सरकार राज्यात पुन्हा आणण्यासाठी महायुतीचे उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केलं. तर खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची साथ असल्याने आपण विजयाचा चौकार मारणार असल्याचा विश्वास मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. तळवडे येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
ते म्हणाले, पाच वर्षात २६ शे कोटीची काम मी केलीत. महायुतीच्या लोकप्रतिनिधीनी या विकासात साथ दिली. राज्यात
शिंदे-फडणवीस यांच्या जोडीने केलेलं काम बघून अजित पवार देखील सरकारमध्ये आले. विकास कामांचा धडाका आमच्या सरकारने लावला.
जर्मनीशी करार करत पहिली बॅच तिथे पाठवली. चांगल्या पगाराची नोकरी तिथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. माझ्यावर मोठ्या पदांच्या जबाबदाऱ्या एकनाथ शिंदे यांनी दिल्या. त्याचा फायदा कोकणातील लोकांसाठी जनतेला न्याय देण्यासाठी मी केला. शिक्षणमंत्री व मराठी भाषा मंत्री म्हणून धोरणात्मक निर्णय घेतले असे प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केले. तळवडे येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजप जिल्हा संघटक महेश सारंग, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, अँड. निता सावंत, नारायण राणे, रविंद्र मडगावकर, पंकज पेडणेकर, प्रमोद गावडे, विद्याधर परब, सुरज परब आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.