सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पैसे खाऊन उभारण्यात आला. उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याने भोळा कोकणी माणूस भुलला. त्यांना मोदी शिवभक्त वाटले. पण, ते डाकू, दरोडेखोर आहेत. इथले लोकप्रतिनिधी केसरकरांकडे ना श्रद्धा आहे ना सबुरी आहे, खाली मुंडी अन्न…., असा जोरदार हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच खासदारकीला झालेली गडबड आता होऊ देऊ नका. कोकण आणि शिवसेना हे वेगळं नातं आहे. गुंडांच्या हातात कोकण देऊ नका असं आवाहन करत राजन तेलींना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन श्री. ठाकरेनी केले. सावंतवाडी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी श्री. ठाकरे म्हणाले, खासदारकीला गडबल झाली अन् आपलं नातं तोडण्याचा प्रयत्न झाला. मतदाना दिवशीही टेबल टाकली गेली होती. त्यामुळे यावेळी सावध रहा. कोकण आणि शिवसेनेच नातं वेगळं आहे. आज आम्ही सगळे एकत्र आलोत. गुंडांच्या हातात कोकण देऊन चालणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे. राजन तेली यांना येथील जनता आमदार करणार आहे यात शंका नाही. पण, ज्या केसरकर यांना आम्ही मोठं केलं त्या माणसात श्रद्धा नाही अन् सबुरीही नाही असा टोला त्यांनी हाणला. तसेच
मालवण येथील छत्रपतींचा पुतळा पैसै खाऊन उभा करण्यात आला होता. त्यांना हा पुतळा ईव्हीएमच मशीन वाटलं. मोदी आल्याने भोळा कोकणी माणूस भुलला. त्यांना ते शिवभक्त वाटले. पण, हे डाकू, दरोडेखोर आहेत असा घणाघाती प्रहार ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर केला. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी उभारलेला किल्ला जशास तसा आहे. मात्र, पुतळा कोसळला अशी टीका त्यांनी केली. तर पुतळा कोसळला तेव्हा वाईटातून चांगलं होईल असे विधानं इथल्या आमदारांनी केल. यांच्या डोक्यात मेंदू आहे की नाही ? याची शंका येते. त्यामुळे केसरकर पडल्यानंतरच चांगलं होईल असे विधान उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.
दरम्यान, मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच कर्ज मुक्त आम्ही केलं. सरकार आलं की पुन्हा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ. निवडणूकीनंतर हे कोकण दरोडेखोरांच्या हाती द्यायचं का? हे तुम्हाला ठरवायचे आहे. मला कोणीतरी आव्हान दिलं. हॅलीकॉप्टरने नको रस्त्यान या,
मी रस्त्यान येतो अन् रस्त्यानं जातोय असा टोला राणेंना नाव न घेता हाणला. ही माणसं शिवद्रोही आहेत. पुतळा कोसळला तेव्हा काळी कृत्य यांनी केली. दुर्दैवाने यांच घोड गंगेत न्हाले. पण, आता ती चूक होऊ देऊ नका. कोकणात भगवा फडकला पाहिजे. कॉग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत आहेत अस ते म्हणाले. तसेच काहीजण महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करण्यासाठी बंडखोरी करत आहेत. त्यांनी पापाचे धनी होऊ नका असे आवाहन ठाकरेनी केले. अजूनही वेळ गेलेली नाही अस ते म्हणाले. तर लोकसभेला तेली आले असते तर निकाल वेगळा लागला असता असं विधान करत ‘देर हे मगर, अंधेर नहीं है..!’ हाती मशाल असल्याने प्रकाश सोबत असून राजन तेली यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. सावंतवाडी गांधी चौक येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. दरम्यान, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. ते शिवसेनेत सक्रिय होते. त्यांच्या उबाठा शिवसेनेतील प्रवेशामुळे शिवसेनेला हा धक्का बसला आहे.उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात ते केलं ते कोणी करू शकले नाही. नारायण राणे कॉग्रेसमध्ये आले तेव्हा विरोध करण्याच काम मी केलं. पक्षाचा राजीनामा दिला. आज हाती शिवबंधन बांधल्याचे श्री. सावंत यांनी मनोगतात सांगितले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, ब्रिगेडियर सुधिर सावंत, माजी आमदार तथा विधानसभेचा उमेदवार राजन तेली, आम. मिलिंद नार्वेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, परशुराम उपरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अतुल रावराणे, सतिश सावंत, तेजस ठाकरे, अँड. दिलीप नार्वेकर, उबाठाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,काॅग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, स्टार प्रचारक शरद कोळी, प्रवक्ते डाॅ.जयेंद्र परुळेकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, महेंद्र सांगेलकर,मायकल डिसोजा,राजू नाईक,रमेश गावकर,शब्बीर मणियार, गुणाजी गावडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मतदारसंघात आरोग्याचा प्रश्न जटील आहे. उद्धव ठाकरेंनी मल्टीस्पेशालिटीसाठी मुख्यमंत्री असताना निधी देऊनही ते उभं राहील नाही. रोजगाराचा मोठा प्रश्न इथे आहे. गोवा येथे रोजगारासाठी ये-जा करणाऱ्या येथील युवकांचे अपघातात मृत्यू होत आहेत. दोडामार्ग एमआयडीसीत उद्योग उभे राहू शकले नाहीत असे मत व्यक्त करत उमेदवार राजन तेली यांनी या विषयांसह ताज पंचतारांकित हॉटेलबाबत स्वतः लक्ष घालावा असे आवाहन उद्धव ठाकरेंना केले. याआधी माझ्या मुलावर मुंबईत हल्ले झालेत. यापुढे तुमची साथ द्या, जे दादागिरी करत आहेत त्यांना सामोरे जातो असे विधान तेलींनी केले.
माजी खासदार विनायक राऊत व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी बंडखोर अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांच्यावर टीकास्त्र सोडले. अपक्ष उमेदवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. महाविकास आघाडीची मत खाण्यासाठी यांना उभे केले गेले आहे. त्यामुळे मशालीला मत द्या, महाविकास आघाडीच सरकार राज्यात आणा असे आवाहन विनायक राऊत यांनी केले. राजन तेली यांच्या सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याची किंमत भाजपला कळली नाही. त्यांना उमेदवारी न देता धोकेबाज लोकांना उमेदवारी दिली गेली. सावंतवाडीत येऊन नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली तरी सावंतवाडीची जनता यांना जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले,अर्चना घारे-परब यांना मत देण हे केसरकर यांना मत देण्यासारख आहे. या मतामुळे परीणाम होऊ शकतो. बटन दुसरीकडे दाबले गेले तर केसरकरांना मत मिळणार आहे. आमच्या राष्ट्रीय नेत्यांचा अवमान त्यांनी केला आहे. त्यामुळे योग्य असा उमेदवार राजन तेली यांच्या रूपाने निवडून द्यावा, असे आवाहन प्रवीण भोसले यांनी केले.
शिवसेना उपनेते स्टार प्रचारक शरद कोळी सावंतवाडीच्या सभेस उपस्थित होते. राणे, केसरकरांवर ते तोंडसुख घेणार याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. यामुळे कोळींनी पोलिसांसह निवडणूक आयोगालाच लक्ष केलं. राजन तेली यांचा विजय निश्चित आहे. उद्धव ठाकरेंची बॅग तपासणारा निवडणूक आयोग पक्ष फुटले, चिन्ह चोरल तेव्हा कुठे शेपूट घालून बिळात लपला होता ?असा सवाल केला. मला नोटीस देणाऱ्या पोलीस यंत्रणेने इतरांना देखील नोटीस बजावण्याच धाडस दाखवाव. तेव्हा नोटीस देत नाही. माझ्या येण्याने कोणाच्या बुडाला आग लागली ? की आज मला नोटीस द्यावी लागली असा सवाल केला. केसरकर, राणेंवर टीका करत येत्या निवडणूकीत राजन तेलींना निवडून देत केसरकरांना धक्का द्या, उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करा असे आवाहन त्यांनी केले.